महाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असून, १६० अक्षांश उत्तर ते २२० अक्षांश उत्तर आणि ७२.८० रेखांश पूर्व दरम्यान वसलेले आहे. महाराष्ट्र राज्य कोकण किनारपट्टी, सह्याद्री रांगा (पश्चिम घाट) आणि दख्खनचे पठार या तीन विभागात विभागलेले आहे. ते समशितोष्ण हवामान प्रकारात मोडत असून, हवामान तीन ऋतूंमध्ये विभागले आहे. महाराष्ट्र राज्य हे सामान्यतः नऊ कृषी हवामान विभागात विभागले जाते. या विविध विभागांमध्ये पर्जन्यमानामध्ये मोठी तफावत दिसून येते. घाट आणि किनारपट्टी यांच्या अंतर्गत असलेल्या जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान २००० मि.मी. आहे. राज्याचा काही भाग पर्जन्यछायेच्या अंतर्गत येत असून तेथील पर्जन्यमान सरासरी ६०० ते ७०० मि.मी. पर्यंत असते. महाराष्ट्र राज्यात ५०० ते ३००० मि.मी. यादरम्यान पर्जन्यमान होते. वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ही १००० मि.मी. असून पर्जन्यदिन ६० ते ७० दिवस आहेत.
राज्यात भात, बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, हरभरा या मुख्य पिकांबरोबर तेलवर्गीय पिकांत सूर्यफूल, भुईमूग आणि सोयाबीन, तर नगदी पिकात कापूस, ऊस व हळद आणि भाजीपाला पिके सामान्यत: घेतली जातात. राज्याचा सरासरी १०.९१ लाख हेक्टर क्षेत्र फळपिकांच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्राचे एकुण भौगोलिक क्षेत्र ३,०७.५८ लाख हेक्टर असून एकूण पिकाखालील क्षेत्र हे २२५.५६ लाख हेक्टर आहे. यापैकी १४१.९४ लाख हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू आहे. शेतीचे लहान लहान तुकड्यात विभागणी होत गेल्याने अल्पभूधारक आणि सिमांत (लहान) शेतकऱ्यांचे प्रमाण ६८ टक्के आहे. कापूस कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापूस पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान पुढील प्रमाणे -
उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २९.८ ते ३६.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.४ ते २३.३ अंश सेल्सिअस, -पाते लागण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २८.० ते ३२.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.१ ते २३.६ अंश सेल्सिअस. फुले लागण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २९.४ ते ३२.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.२ ते २३.४ अंश सेल्सिअस. - बोंडे लागण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २७.६ ते ३१.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.६ ते २२.७ अंश सेल्सिअस. कापूस पिकाचा पाते लागणे ते फुले लागणे हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. या कालावधीमध्ये पावसाने उघडीप दिल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. पिकाच्या उत्पादनातील घट टाळण्यासाठी पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास पाणी व्यवस्थापन करावे. सोयाबीन सोयाबीन या तेलवर्गीय पिकाचीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीन पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान पुढील प्रमाणे -
उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २७.० ते ३५.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० ते २६.० अंश सेल्सिअस. -फुलधारणेच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २५.० ते ३२.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० ते २५.० अंश सेल्सिअस. - शेंगा लागण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २५.० ते ३२.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० ते ३२.० अंश सेल्सिअस. शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २६.० ते ३२.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.० ते २४.० अंश सेल्सिअस. सोयाबीन पिकाचा फुले लागणे ते शेंगा परिपक्व होणे हा कालावधी मुख्य असून, या कालावधीमध्ये जमिनीतील ओलावा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. मात्र, या कालावधीत पावसाने उघडीप दिल्यास आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. भात भात हे पीक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची लागवड शक्यतो अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशात केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान पुढील प्रमाणे -
भात पिकाच्या उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २८.० ते ३४.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.० ते २५.० अंश सेल्सिअस. फुलधारणेच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस. परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.० ते ३१.० अंश सेल्सिअस. भात पिकाचा फुले लागणे ते परिपक्व होणे या कालावधीमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असते. या कालावधीमध्ये जमिनीतील ओलावा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. या कालावधीत पावसाने उघाड दिल्यास आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले आहे. संपर्क- डाॅ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ (अखिल भारतीय समन्वयित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)