पुणे : माॅन्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाची जोर‘धार’ सुरूच आहे. दोन दिवसांपासून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रविवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रत्नागिरी, राजापूर, मुरूड येथे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी दिवसभर पावसाचा जोर टिकून होता. माॅन्सूनने शुक्रवारी कोकणात हजेरी लावल्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला असून, शेतांना तळ्याचे स्वरुप आले आहे. सखल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबईसह कोकणातील वीसहून अधिक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, यातील नऊ ठिकाणी दीडशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भातही पूर्वमोसमी पावसाने जोर धरल्याने रविवारी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी ५० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडला असला तरी उर्वरीत जिल्ह्यात मॉन्सूनने अद्याप जोर धरलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील गगनबावडा, पन्हाळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यातील रेनापूर येथे १२० मिलिमीटर, तर कळमनुरी येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी परभणीसह इतर जिल्ह्यात जोर कमी होता. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत हवामान विभाग) :
दक्षिण कोकणात मुसळधारेची शक्यता कोकणात पावसाने जोर धरला असून, दक्षिण कोकणात बुधवारपर्यंत (ता.१३) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. आज (ता.११) उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गुरुवारपर्यंत (ता.१४) कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून जैसे थे नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी मुंबईसह, ठाणे, नगर, यवतमाळ, ब्रह्मपुरीपर्यंत मजल मारून निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र रविवारी (ता.१०) माॅन्सूनची स्थिती जैसे थे असून, कोणतीही प्रगती झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होतो. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ओडिशा पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत (ता.१२) विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात मॉन्सूनची प्रगती शक्य आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.