कुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. एक तार उसाच्या पिकावर पडली. त्यामुळे आग लागून चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकरी जगन बन्सीधर कंटुले (गट क्रमांक ४२२) यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कंटुले यांच्या शेतातून राजाटाकळी-अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनी गेली आहे. या वाहिनीच्या जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत. खांबावर तारा बांधलेल्या चिनी मातीच्या चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे तारांना धर राहिलेला नाही. त्या मोकळ्या झाल्या आहेत. शुक्रवारी (ता.२७) दिवसभर वारे असल्याने या तारांचे घर्षण झाले. यामुळे एक तार खांबावर असलेल्या चिमणीतुन निसटून उसावर पडली. त्यामुळे उसाने पेट घेतला. वारे असल्यामुळे आग भडकली. नजीकच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पूर्ण ऊस जळून खाक झाला.
परतीच्या पावसाने शेतशिवारातील अनेक विजेचे खांब वाकले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत. खांबावरील चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे तारा निसटून खाली येतात. वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे केली नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले. मात्र, याकडे दुर्लक्ष केले. यामुळे हे नुकसान झाले. - जगन कंटुले, नुकसानग्रस्त शेतकरी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.