नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत जनजागृतीचा अभाव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. त्यासाठी आता केवळ पाच दिवसांची मुदत शिल्लक आहे. मात्र अर्ज भरण्याबाबत थेट मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. ऑनलाइन अर्ज करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असा सरकारचा प्रयत्न असला, तरी येथील कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने जास्त अर्ज दाखल होतील, असे दिसत नाही. 

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित पॅडी, ट्रान्सप्लांटर, इतर स्वयंचलित यंत्रे, कल्टिव्हेटर, पलटी नांगर, रोटाव्हेटर, रोटा कल्‍टिव्हेटर, पॉवर विडर, प्लॅंटर, पॉवर विडर, मळणीयंत्र, कापूस पऱ्हाटी श्रेडर, ब्रश कटर आदींसह पूरक, प्रक्रिया उद्योगासाठी मिनी राइस मिल, मिनी डाळ मिल, पॅकिंग मशिनचा लाभ दिला जातो.

त्यासाठी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेतून ऑनलाइन अर्ज मागवले जातात. त्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध असतो. योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून शासन स्तरावरून योजनेला व्यापक प्रसिद्धी देण्यासह गावोगावी जाऊन माहिती द्यावी, असे आदेशित केलेले आहे. अधिक लोकांनी अर्ज करावेत यासाठी कृषी विभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे.

मात्र नगर जिल्ह्यात या योजनेबाबत जागृती झाली नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उन्नत शेती- समृद्ध शेतकरी योजना आहे तरी काय, हेच माहिती नाही. त्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी नगरमध्ये कृषी विभागाची उदासीनता असल्याने योजनेला आत्तापर्यंत तरी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी योजनेतून २१ हजार अर्ज आले होते. उन्नत शेती- समृद्ध शेतकरी अभियानाच्या जागृतीबाबत ‘आमचे काम सुरू आहे’ एवढेच उत्तर कृषी विभागाकडून दिले जात आहे. याबाबत कृषी आयुक्तालयाने दखल घेणे गरजेचे असल्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

गेल्या वर्षी भरलेल्या अर्जांचे काय? उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातून अवजारांचा लाभ मिळावा यासाठी दरवर्षी ऑनलाइन अर्ज मागवले जातात. त्यातील सोडत पद्धतीने लाभार्थी निवडी करून पात्र यादी तयार केली जाते. ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांच्या अर्जाचे काय? त्यांनी नव्याने अर्ज करायचा, की जुन्या यादीनुसार लाभ मिळणार याची माहिती अनेकांना नाही आणि कृषी विभागही शेतकऱ्यांना सांगत नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या भरलेल्या अर्जाचे काय, हा संभ्रमही कायम आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com