तंत्रज्ञानासाठी सत्याग्रह करणारे ४२० कसे : ललित बहाळे

शेतकरी संघटना
शेतकरी संघटना

अकोला ः तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी सविनय सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध प्रशासनाने पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासह पर्यावरण कायदा, बीज अधिनियमनांतर्गत अनेक कलमांद्वारे गुन्हे दाखल केले आहेत. तंत्रज्ञानाचा आग्रह धरणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणती व कुणाची फसवणूक केली? शासनाने ४२० कलमान्वये गुन्हा कसा दाखल केला?, असे प्रश्‍न शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे यांनी केले.   शासनाने आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर संघटनेची भूमिका मांडण्यासाठी बुधवारी (ता. २६) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनोद मोहोकार, विलास ताथोड, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, नीलेश नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. बहाळे पुढे म्हणाले, वास्तविक जनुकीय तंत्रज्ञानाच्या शेती क्षेत्रातील वापरावर बंदीच्या विरुद्ध सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांवर भारतीय दंड संहितेतील कलमांचा वापर करून कार्यवाही करणे हा सत्याग्रहाचे पावीत्र्य भंग करण्याचाच प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतीच नाही तर एकूण संपूर्ण भारत जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम व्हावा यासाठी विज्ञान आणी तंत्रज्ञानाच्या मार्गक्रमणाचा आग्रह धरणाऱ्या शेतकरी सत्याग्रह्यांवर भारतीय दंडसंहितेतील ४२० सारख्या कलमांचा वापर करणे दुःखद आहे. एचटीबीटी वरील बंदीमुळे बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचीच फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे, असे असतानाही शेतकरी हा फसवत आहे, असे शासनास कसे वाटू शकते. सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांची एकही तक्रार नसतानाही प्रशासनाने शेतकरी व शासनाची फसवणूक झाल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाने शेती व्यवसायातील काटकसर वाढावी, गुणविशेष वाणांची निवड करता यावी, विपरीत हवामानात तग धरू शकतील अशा वाणांची उपलब्धता व्हावी अशा अनेक कारणांसाठी जनुकीय तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. हे बहुआयामी तंत्रज्ञान मिळवण्यासाठी संघर्ष करणे भाग पडावे हा अपमान आहे. भारत सरकारच्या एका शास्त्रीय समितीच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात किमान १५% लागवड एचटीबीटी होते. ही आकडेवारी सध्या सुरू असलेल्या सत्याग्रहाच्या कितीतरी आधीची आहे. हे आंदोलन प्रतीकात्मक आहे. तंत्रज्ञानाचा वापर चोरून लपून होऊ नये, तसे झाल्यास समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, तसे होणे थांबले पाहिजे म्हणून आंदोलन करावे लागत आहे. देशव्यापी चर्चेतून तंत्रज्ञानाच्या वाटा भारतीय शेतकऱ्यांसाठी खुल्या व्हाव्यात. जेणेकरून तो जागतिक स्तरावर शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकेल. स्पर्धेत टिकू शकेल. यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे,’’ असेही बहाळे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com