परभणी : गतवर्षीच्या खरिपातील विमा परतावा अद्याप प्रलंबित

गतवर्षीच्या खरिपातील विमा परतावा अद्याप प्रलंबित
गतवर्षीच्या खरिपातील विमा परतावा अद्याप प्रलंबित

परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी(२०१८)च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस या पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ३ शेतकऱ्यांना ६३ कोटी ४८ लाख ८१७ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ६१ कोटी ५३ लाख ७६० रुपये एवढी परताव्याची रक्कम देण्यात आली. परंतु अद्याप ४३ हजार ७८३ शेतकऱ्यांची २ कोटी १० लाख ३५ हजार ३०० रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित राहिली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५ लाख ८५ जार ८८५ विमा प्रस्ताव सादर करत एकूण ३ लाख ५० हजार ८२ हेक्टरवरील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिकांसाठी १ हजार २३३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकूण २८ कोटी ६३ लाख ३४ हजार १०० रुपये एवढा विमा हप्ता कंपनीकडे भरला होता.

गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी नियुक्त इफ्फको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी या चार पिकांच्या नुकसानीबद्दल ७ तालुक्यांतील १४ मंडळांमधील ३४ हजार २४१ शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ६३ हजार २७९ एवढा पीकविमा परतावा मंजूर केला होता. तसेच जिल्ह्यातील ३८ मंडळांतील ५८ हजार ६९३ शेतकऱ्यांना १८ कोटी ७४ हजार १४५ रुपये एवढा तूर पिकाचा मध्य हंगामी (एकूण संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम) विमा परतावादेखील मंजूर केला होता. 

त्यानंतर पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या निष्कर्षानंतर १४ मंडळातील शेतकऱ्यांना कपाशीचा आणि ५ मंडळातील शेतकऱ्यांना तुरीचा विमा परतावा मंजूर करण्यात आला. तसेच ज्वारी, बाजरी, उडीद पिकांचा परतावा मंजूर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील पीक विमा परतावा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ३ पर्यंत आणि विमा परताव्याच्या रकमेत ६३ कोटी ३४ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली. आजवर १ लाख ४५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ६१ कोटी ५३ लाख ७६० रुपये (९६.९३ टक्के) विमा परतावा मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप ४३ हजार ७८३ शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली विमा परताव्याची २ कोटी १० लाख ३५ हजार ३०० रुपये रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित राहिली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गतवर्षीचा पीक विमा परतावा मंजूर झालेली मंडळे सोयाबीन ः परभणी, पेडगांव, जांब, सेलू, चिकलठाणा, कुपटा, वालूर, देऊळगांव गात, मानवत, केकरजवळा, कोल्हा. मूग ः बामणी, चिकलठाणा, मानवत, कात्नेश्वर, पूर्णा. उडीद ः चिकलठाणा. ज्वारी ः परभणी, पेडगाव, जांब, पिंगळी, सिंगणापूर, दैठणा, झरी, बोरी, जिंतूर, चारठाणा, बामणी, सावंगी म्हाळसा, आडगाव, चिकलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, वालूर, केकरजवळा, कोल्हा, मानवत, पाथरी, बाभळगाव, हदगाव, आवलगाव, सोनपेठ, गंगाखेड, महातपुरी, माखणी, चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा, ताडकळस. बाजरी ः बोरी, जिंतूर, चारठाणा, सावंगी म्हाळसा, आडगाव, चिकलठाणा, हादगाव बु. कापूस ः पेडगाव, जांब, सिंगणापूर, सेलू, कुपटा, वालूर, चिकलठाणा, देऊळगाव गात, केकरजवळा, मानवत, पाथरी, हदगाव, बाभळगाव, पूर्णा. तूर ः पालम, चाटोरी, बनवस , सोनपेठ, आवलगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com