पेरू, लिंबाचे विमा कवच काढले

राज्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा धोरणापासून दूर ठेवले होते. त्यामुळे सतत पाठपुरावा करून विमा योजनेत पेरूचा समावेश झाला. मात्र, आता संघटनेला विश्वासात न घेता फळपिकाला योजनेला वगळण्यात आले. हा अन्याय असून, आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत. - विनायक दंडवते, अध्यक्ष, अखिल भारतीय पेरू उत्पादक संघ
लिंबू, पेरू
लिंबू, पेरू

पुणे : राज्यातील पेरू व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेत मिळालेले सुरक्षा कवच राज्य शासनाने काढून टाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सापेक्ष आर्द्रता आणि गारपीट अशा दोन धोक्यांना पेरू पिकासाठी गेल्या हंगामापर्यंत विमा कवच दिले जात होते. राज्यातील लिंबू बागांना मात्र अवेळी पाऊस, जादा तापमान, जादा पाऊस आणि गारपीट अशा चार धोक्यांकरीता विमा कवच दिले गेले होते. पेरू बागेला हेक्टरी ७३ हजार रुपये, तर लिंबू बागांना काही जिल्ह्यात हेक्टरी ६६ हजार रुपयांपर्यंत विमा कवच उपलब्ध होते. पेरू बागांना विमा योजनेतून वगळण्यात आल्यामुळे आता नगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, कर्जत तसेच बुलडाणा भागात बुलडाणा, चिखली, मेहकर भागातील पेरू उत्पादकांना विमा कवच मिळणार नाही.  याशिवाय नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, जळगाव आणि सांगली भागांतील पेरू बागादेखील विम्याअभावी असुरक्षित बनल्या आहेत. कोणत्याही प्रतिकुल हवामानात तग धरून राहण्याची क्षमता लिंबू बागांची असली विमा कवच असल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा या योजनेचा होता. मात्र, शासनाने आता धुळे, वाशीम, बुलडाणा, बीड, सांगली, नगर, परभणी, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, जालना, वर्धा आणि नाशिक भागांतील लिंबू बागांचे विमा संरक्षण काढून टाकले आहे. नाशिक, नगर, पुणे या भागांत पेरूच्या बागा चांगल्या पद्धतीने आकार घेत आहेत. “नगर भागात तीन दिवस सापेक्ष आर्द्रता सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास हेक्टरी ९ हजार आणि पाच दिवस जादा राहिल्यास ५५ हजार रुपये अशी भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती. गारपिटीला हेक्टरी १८ हजार रुपये मिळत होते. मुळात विमा कवच अचानक का काढून घेण्यात आले हेच आम्हाला कळलेले नाही, अशी माहिती पेरू उत्पादक संघाच्या प्रतिनिधीने दिली. वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “लिंबू बागांना विमा योजनेतून वगळण्याची शिफारस जिल्हास्तरावरून कोणत्याही अधिकाऱ्याने केलेली नव्हती. तीन हजार ३०० रुपये भरून शेतकऱ्याच्या लिंबू बागेला हेक्टरी ६६ हजारांचे विमा कवच मिळत होते. विमा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून ११ हजार ८०० रुपये अनुदान मिळत होते. राज्य शासनदेखील तितकीच रक्कम विमा हप्ता अनुदान म्हणून देत होती.” तुघलकी निर्णय कोणाचा? पेरू व लिंबू बागांचे विमा कवच अचानक काढून टाकण्याचा तुघलकी निर्णय नेमका कोणी घेतला याविषयी कृषी विभागातदेखील कोणी बोलण्यास तयार नाही. ‘राज्यात सध्या सरकार स्थापन झालेले नाही. मात्र, नवे कृषिमंत्री आल्यानंतर शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला तरच यात बदल होईल. अन्यथा, पेरू व लिंबू उत्पादकांना विमा कवचापासून कायमचे दूर रहावे लागेल,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com