ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

दरवर्षी सप्टेंबरमध्ये साखर कारखाने निश्चित सुरू होतात. यंदा अजून कारखाने सुरू होताना दिसत नाहीत. शिवाय दुष्काळ, अतिपाऊस व अन्य बाबींमुळे यंदा राज्यातील सर्वच कारखान्यांना ऊसटंचाईला सामोरे लागणार असल्याचे दिसत आहे. जास्त दिवस कारखाने सुरू राहणार नसल्याने मजुरांनाही उचली कमी मिळत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम साधारण तीन महिनेच चालण्याची शक्यता असल्याने मजुरांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे मजुरांची अर्थिक स्थितीही गंभीर असणार आहे. - गहिनीनाथ थोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार, मुकादम युनियन.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले. यंदा अतिपावसाने उसाचे नुकसान झाले; तर काही भागात पाऊस नसल्याने ऊस लागवडी झाल्या नाहीत. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होणार आहेच, पण ऊस टंचाईचा मोठा फटका राज्यातील ऊसतोड कामगारांना सहन करावा लागणार आहे. बरेच साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता असल्याने व ऊसटंचाईमुळे गाळप हंगामही फार दिवस सुरू राहणार नसल्याने कारखान्यांनी उचल देण्यास हात आखडता घेतला. त्यामुळे मजुरांना मिळणारी उचलही दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्के कमी झाली आहे. 

दसरा-दिवाळीच्या काळात साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे राज्यातील ऊसतोडणी कामगारांची दिवाळीच्या धामधूमीत कारखान्यांवर जायची धावपळ सुरू असते. राज्यात साधारण बारा ते चौदा लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊसतोडणी करण्यासाठी विविध साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. यात बीड, नगर, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जळगाव, विदर्भातील मजुरांची संख्या अधिक आहे.

गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ होता. त्यामुळे पाणीटंचाईचा परिणाम ऊस लागवडीवर झाला. शिवाय मोठ्या प्रमाणात ऊस जनावरांच्या छावण्यासाठी गेला. साधारण जून-जुलैमध्ये तोडणी झालेला ऊस पुन्हा कारखान्यांसाठी तोडणीला येणार नाही. यंदाही पावसाळ्यात अगदी सप्टेंबरपर्यत फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन लागवडी झाल्या नाही तर उसाचा पट्टा असलेल्या सांगली, सातारा, नाशिक आदी भागासह मोठ्या नद्याचा पट्टा असलेल्या भागात जास्त पावसामुळे उसाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा राज्यभर ऊसटंचाई आहे. दरवर्षी राज्यभरात सरासरी ९०० ते ९५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होत असते. यंदा मात्र साडेचारशे ते ५०० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप होण्याची शक्यता नाही. केवळ ऊसटंचाईमुळे अनेक कारखाने बंद राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मजुरांची संख्या अतिरिक्त होणार आहे. परिणामी, मुकादमांना दिल्या जाणाऱ्या उचलीत साखर कारखान्यांनी हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे मुकदमही मजुरांना उचल देताना दरवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केच रक्कम देत आहेत.    कमी कालावधीमुळे आर्थिक नुकसान  राज्यात साखर कारखान्याचा गाळप हंगाम साधारण सहा ते सात महिने असतो. यंदा मात्र ऊसच उपलब्ध नसल्याने गाळप हंगाम साधारण अडीच ते तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणार नाही, असे मुकादम सांगत आहेत. कमी कालावधीमुळे मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गेल्या वर्षीही ऊसटंचाई असल्याने हंगाम कमी काळच सुरू राहिला होता. यंदाची स्थिती मात्र गंभीर असून, ऊसटंचाईचा मोठा फटका राज्यातील ऊसतोड कामगारांना सहन लागणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com