मूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीला प्रतिसाद नाही

बाजारात मूग, उडदाची आवक सुरू होण्याआधीच खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. मात्र, दरवर्षी उशिरा खरेदी केंद्रे सुरू केली जातात. गेल्यावर्षी ज्यांनी विक्री केली त्यांना लवकर पैसे मिळाले नाही. हमीभावाने खरेदी व्हावी यासाठी शासनाने गांभियाने घ्यायला हवे. - बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : मूग, उडिद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कमी प्रमाणात केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यावर शेतीमाल विक्रीसाठी अगोदर शासनाकडून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. आता ऑनलाइन नोंदणीची मुदत संपायला अवघा एक दिवस शिल्लक असताना शेतकऱ्यांकडून नोंदणीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ‘‘अजून नोंदणीचा अहवाल आला नाही’’ असे मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाकडून सांगितले जात असले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घटत्या उत्पादनाचाही खरेदीवर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. गतवर्षी राज्यभर अशीच स्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बाजारात व्यापारी मालाचा दर्जा नसल्याचे कारण पुढे करत हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करीत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यावर कारवाई करण्याची तरतूद असली तरी अजून तरी कारवाई कुठेच झालेली नाही. सध्या नगर जिल्ह्यामध्ये कोणत्याच बाजार समितीत मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा या शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांकडील सोयाबीन, उडीद, मूग हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्यभरात साधारण २७४ हमीभाव केंद्रे सुरू करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे दिलेली आहे. फेडरेशनने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी बाजार समित्या, संस्थांकडून प्रस्ताव मागितले. आलेल्या प्रस्तावांना वरिष्ठ पातळीवरून मान्यताही दिली.

एक ऑक्‍टोबरपासून या केंद्रांवरून शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्रावर सोयाबीन, उडीद, मुगाची विक्री करण्यासाठी दोन वर्षांपासून अगोदर ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पहिल्या वर्षी नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र, गेल्यावर्षी नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर ज्यांनी नोंदणी केली त्यांनीही केंद्राकडे पाठची फिरवली. 

यंदाही फारशी स्थिती चांगली असल्याचे दिसत नाही. नोंदणी सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. आता नोंदणीची मुदत उद्या (सोमवारी) संपत आहे. असे असले तरी अजूनही फारशा प्रमाणात नोंदणी झालेली नाही. ‘‘नोंदणीचा अहवाल अजून आलेला नाही.’’ असे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात नोंदणीच झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये राहुरी, शेवगाव, जामखेड, नगर, पारनेर, पाथर्डी येथे हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहे. डिसेंबरअखेर पर्यंत खरेदी सुरू राहणार असली तरी नोंदणीला प्रतिसाद नसल्याने लाखो क्विंटल खरेदीचे उद्दिष्ठ ठेवूनही खरेदी होईलच याची आता खात्री दिसत नाही. नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने मुदत वाढवावी लागणार आहे. या केंद्रावर तुरीला पाच हजार ८०० रुपये तर उडिदासाठी पाच हजार ७०० रुपये, मुगासाठी सात हजार ५० रुपये तर सोयाबीनसाठी तीन हजार ७१० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला जाणार आहे.   उत्पादन घटीचाही परिणाम  यंदा काही भागांत जोरदार पाऊस असल्याने तर काही भागांत पाऊस नसल्याने पिके गेली आहेत. नगरसह राज्याच्या अनेक भागांत यंदा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा मूग, उडदाच्या उत्पादनात घट झाली असून सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणामही यंदा हमीभावाने खरेदी केंद्रांवरील खरेदीवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com