आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला माणगंगा साखर कारखाना जिल्हा बँकेकडून परत घेऊन पूर्ण क्षमतेने चालून दाखवून देऊ. कारखाना सुरू करण्यासाठी गरज असलेले पैसे विविध माध्यमांतून उभे राहू शकतात. तरीही काही पैशांची गरज असून, त्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी शेअर्सच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले. येथील जिम्नॅस्टिक हॉलमध्ये माणगंगा साखर कारखान्याच्या संदर्भात शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, देशमुख बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक सावंता पुसावळे, माजी सभापती बळीअणणा मोरे, भगवानराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, माजी सभापती हरीभाऊ माने, डी. टी पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्यामुळे उसाखालील क्षेत्र वाढले आहे, मात्र दुसरे साखर कारखाने पंधरा ते सोळा महिने उसाला झाले तरी ऊस तोडून नेत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे सांगून त्यासाठी माणगंगा साखर कारखाना जिल्हा बँकेकडून परत घेऊन सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या वेळी अमरसिंह देशमुख यांनी माणगंगा कारखाना आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांना सांगितली. तसेच ‘‘जिल्हा बँकेकडून कारखाना विकत घेऊन पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी पावणे दोनशे कोटींची गरज आहे. कर्ज आणि इतर स्वरूपात दीडशे कोटींपर्यंत उभा करू शकतो. तरीही पंचवीस कोटीची गरज असून सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार शेअरच्या रूपातून मदत करावी. पहिल्या चार वर्षांनंतर त्यांच्या शेअर्सना योग्य मोबदला दिला जाईल,’’ असे मत मांडले. या वेळी सर्वच शेतकरी कार्यकर्त्यांनी मदत करण्याचा शब्द दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.