खेडीभोकरीला बोटीतून होतोय जीवघेणा प्रवास

life-threatening journey through the boat in Khedibhokri
life-threatening journey through the boat in Khedibhokri

जळगाव : खेडीभोकरी (ता. चोपडा) ते भोकर (ता. जळगाव) या दरम्यान तापी नदीवर हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. यंदा नदीत मोठे प्रवाही पाणी असल्याने हा पूल उभारलेला नाही. यामुळे नदी पार करण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागत आहे. खेडीभोकरी ते भोकरदरम्यान वाहतुकीसंबंधी तापी नदीवर मोठा पक्‍क्‍या स्वरूपातील पूल बांधण्यासंबंधीचे आश्‍वासन अनेकदा लोकप्रतिनिधींनी दिले, परंतु ही आश्‍वासने हवेत विरली आहेत. यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न देखील यामुळे निर्माण होत आहे. 

जळगाव तालुक्‍यातील भोकर आणि चोपडा तालुक्‍यांतील खेडीभोकरी या दोन गावांना जोडण्यासाठी तापी नदीवर ब्रिटिश काळात हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. या पुलाचा वापर चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांत जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा असतो. यामुळे पुलावरून होणारी रहदारी ही बरीच आहे. नदीला पाणी असल्याने पूल अजून टाकण्यास उशीर आहे. परंतु, नागरिकांना एका बाजूने नदीच्या दुसऱ्या काठावर सोडण्यासाठी चार बोटींची व्यवस्था येथे आहे. मात्र, या बोटींमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव येथून जाणाऱ्या प्रत्येकाला येत आहे. 

भोकर ते चोपडा हे अंतर फक्‍त पंधरा किलोमीटर आहे. मात्र, पूल बंद झाल्यास हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी, वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडीभोकरी, भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोरे, करंज, सावखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांना ये- जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा होत असतो. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी याठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून याबाबत मागणी करत आहेत मात्र, याबाबत केवळ आश्‍वासन दिले जात असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कृती झालेली नाही. 

खेडीभोकरीच्या पायथ्याशी चार बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळात बोटींमधून नागरिकांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेण्याचे काम करणे अपेक्षित असताना नागरिकांसोबत दुचाकी देखील ठेवल्या जात आहेत. एका कोटीवर आठ- दहा दुचाकी ठेवून नागरिकांना बसविले जाते. अर्थात बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त जण बसल्याने जानेवारीमध्ये धडगाव तालुक्‍यात नर्मदा प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून पाच जणांचा मृत्यू झाला होता.

अशीच घटना पावसाळ्यात देखील घडली आहे. याचीच पुनर्रावृत्ती खेडीभोकरी येथे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिक आणि दुचाकी अशा वाहतुकीत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्‍न समोर येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com