सांगली ः वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्याची एकूण पाणीपट्टी थकबाकी ४७.८६ लाख इतकी आहे. शिराळा तालुक्यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येता आहेत. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कऱ्हाड तालुक्याची एकूण पाणीपट्टी ३२.४३ लाख इतकी आहे. मुळात कऱ्हाड तालुक्यातील दोन नेत्यांच्या राजकारणामुळे पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचा शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड तालुक्यांना लाभ झाला आहे. कऱ्हाड तालुक्यातून पाणीपट्टी भरण्यास सातत्याने विरोध होत असल्याने ही योजना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पाणीपट्टी भरली तरच ही योजना सुरू होईल.
मात्र, केवळ कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी पाणीपट्टी भरत नसल्याने या योजनेचे वर्षातून एक किंवा दोन आर्वतन मिळते. वाकुर्डे योजना झाली आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील नेत्यांनी कऱ्हाड तालुक्याला पाणी द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली. परंतु कऱ्हाड तालुक्यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना भेटून ‘वाकुर्डे’तून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, अद्यापही पाणी सोडलेले नाही.
कराड तालुक्यातील माजी आमदार विलासराव पाटील (उंडाळकर) आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण या दोघांमध्ये सातत्याने विरोधाचे राजकारण सुरू असते. परिणामी वाकुर्डे उपसा सिंचन योजनचे पाणी सोडले तर काही भागाला मिळते, तर काही भागाला मिळत नाही. यामुळे पाणी मिळत नसल्याने आम्ही पाणीपट्टी का भरावी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुळात, पाणीपट्टी वसुलीसाठी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी शिराळा तालुक्यातील लाभक्षेत्राला मिळते आहे. मात्र, या योजनेचे आवर्तन वर्षाकाठी एक किंवा दोनच मिळते. तरीदेखील या योजनेची पाणी पट्टी भरण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे तालुक्यातून सुमारे ८५ ते ९० टक्के पाणीपट्टीची वसूल होते. पाणीपट्टी वसूल व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाढ पुरावा करताहेत.