साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४ हजार कोटी

साडेआठ लाख शेतकऱ्यांसाठी ४ हजार कोटींची कर्जमाफी बुधवारी जमा होणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत त्रुटी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. कर्जमाफी झाली नाही म्हणून पात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. निकषात पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत योजना बंद करणार नाही. शेतीमालाच्या हमीभावाची खरेदी आधार नोंदणी करून यापुढे करणार आहोत. -देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री
कर्जमाफी
कर्जमाफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली अाहे. साडेआठ लाख खातेदार व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत ८५ टक्के काम पूर्ण करण्यात येईल. तसेच कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १८) दिली.

कर्जमाफी सोहळ्याचे आयोजन बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात करण्यात आले होते. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात तब्बल जवळपास ८.५ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून, यामध्ये कर्जमाफीसाठी चार कोटी ६२ हजार आणि साडेतीन कोटी १८ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.

या वेळी ‘आपले सरकार’ या वेबसाइटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर निवडक शेतकऱ्यांना सदरा, टोपी, साडीचोळी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिवाळीचा मुहूर्त साधून ही कर्जमाफी करण्यात आली. या पुढे दररोज २ ते ५ लाख खात्यांध्ये ही रक्कम भरली जाणार आहे. जवळपास ७७ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आजचा (बुधवार) दिवस कर्तव्य पूर्तीचा दिवस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की सत्तेत आल्यानंतर शेतीत मोठी गुंतवणूक केली आहे. २१ हजार कोटींवरून ६५ हजार कोटींवर शेतीतील गुंतवणूक नेली आहे. ‘जलयुक्त शिवार’चाही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. आधीच्या सरकारने कर्जमाफी केली होती. त्यात बँकांचे भले झाले. त्यांनीच तो पैसा लाटला. त्यामुळेच ऑनलाइनवर भर देण्यात आला आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. हा निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यांचेही आभार मानत असल्याचे फडणवीस यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

कर्जमाफीनंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या प्रक्रियेत येतील. कर्जमाफीसाठी १ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ८९ लाख खाती बॅंकांनी कळवली होती. प्रत्यक्षात ७७ लाख खाती प्राप्त झाली. निकष लावून सरकारने सरसकट कर्जमाफी केली. प्रत्येक बॅंकेत कर्जमाफीसाठी खाते उघडून बॅंकेत पात्र शेतकऱ्यांची यादी देऊन कर्जमाफीची रक्कम जमा करणार, सुट्या संपून सोमवारी सिस्टिम सक्षमपणे सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. या वेळी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शैला दिनेश कदम कोल्हापूर चंद्रकांत पाटील वाडा प्रमोद गमे नागपूर यांनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्राच्या इतिहासात स्वच्छ आणि प्रामाणिक कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे नागपूर येथील शेतकरी श्रीगणे आभार मानले.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी संवाद साधला या वेळी कृषिमंत्री म्हणाले, की दिवाळीच्या मंगलम दिवशी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद पसरविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, त्यांचे अभिनंदन करतो.

कर्जमाफीची मुदतवाढ करा शिवसेनेने सत्तेत राहूनही शेतकरी हितासाठी कर्जमाफीचा आग्रह धरला, मुख्यमंत्र्यांनी शिवसनेनेची मागणी मान्य केली. कर्जथकबाकीची मुदत २०१६ वाढवून ती २०१७ करावी, खानदेशातील केळी उत्पादकांसाठी मार्चऐवजी नोव्हेंबर अखेरची मुदत करावी आणि कुटुंबांची व्याख्या नवरा, बायको आणि अल्पवयीन मुलं अशी एकत्रित बदलून वैयक्तिक महिलांची स्वतंत्र कर्जमाफी करावी, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीसीठी निधी वळविला नाही आपण सगळे आज ऐतिहासिक कर्जमाफीचे साक्षीदार आहोत. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली. सामाजिक न्याय विभागाचा पैसा कर्जमाफीसाठी वळता करणार नाही. तरतुदीनुसार एसी-एसटी निधी राखून ठेवावा लागतो, म्हणून तो दर्शविला असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली आहे. तूर खरेदीही विक्रमी झाली असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी कर्जबाजारीपणाचे विश्लेषण करता आले पाहिजे, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com