जळगाव ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आगामी काळ हा बदलांचा आहे. त्याला सामोरे जावे लागेल व नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागेल. शेतीसह शेतकऱ्यांना बळ मिळावे, यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर शासन भर देईल. त्यासंदर्भात आगामी काळात गतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात बुधवारी (ता.१८) शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी मंत्री महाजन बोलत होते. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अडचणी येतात, पण आत्महत्या हा त्याला पर्याय असू शकत नाही. जळगाव जिल्ह्याने कर्जमाफीसंबंधीच्या कामात ऐतिहासिक काम केले आहे. सर्वात प्रथम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा या वेळी श्री. महाजन यांनी केला.
शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पावले उचलत असून, सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कारदेखील करण्यात आला.