अतिवृष्टीग्रस्त सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार

अतिवृष्टीग्रस्त सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार
अतिवृष्टीग्रस्त सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार

मुंबई : जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांवरील कर्ज माफ करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वीच्या शासन निर्णयात खरीप २०१९ या हंगामात घेतलेले कर्जमाफ करण्याचा उल्लेख होता. त्याऐवजी आता या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्जमाफ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

सांगली, कोल्हापूर, कोकणासह अन्य पूरग्रस्त भागांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र त्यामध्ये २०१९ मधील खरीप हंगामातील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकांवरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले नाही, मात्र पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसानभरपाईच्या तीनपट भरपाई देण्यात येत आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

तसेच गाळाने भरलेली शेते, माती खरडलेली, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागात आणखी चार महिने मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांची पडलेली घरे बांधण्यासाठी मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शेतमजुरांच्या रोजगारासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पुरामुळे ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. 

पूरग्रस्त भागातील पाणी ओसरले आहे. गावांमध्ये स्वच्छतेसाठी शासनासह नागरिक, स्वयंसेवी संस्था काम करत आहे. घर चालविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाच हजार रुपये रोख अनुदान देण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरातील सुमारे २५ हजार गॅस शेगड्या दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत, असेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com