ऑनलाइन अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ऑनलाइन अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून राज्य सरकारने पुन्हा एकदा यू टर्न घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही अखेरची मुदत राहील, असा निर्णय केला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी (ता. २२) ही घोषणा केली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीची नुकतीच बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक झाली. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार खात्याचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषीचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते. या वेळी या समितीने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेत आधीच्या भूमिकेवरून घूमजाव केले आहे.  तसेच शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे.  कर्जमाफीचे हे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी राहिला असल्यामुळे या मुदतीत उर्वरित शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य होते. या संदर्भात अॅग्रोवनमध्ये सविस्तरपणे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्य सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत ग्रामीण भागातील केंद्रे सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली होती.  राज्यात काही ठिकाणी ई-सेवा केंद्रांमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद अवस्थेत आहेत. विशेषतः इंटरनेटचा वेग आणि इतर बाबी अडचणीच्या ठरत आहेत. त्यावर मात करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला समितीने निर्देश दिले आहेत. दोष दुरुस्त करून लवकरात लवकर राज्यातील सर्व ई-सेवा केंद्रे सुरू होतील अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. २१ ऑगस्टअखेर २१ लाख ५७ हजार ३४४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १७ लाख ९५ हजार १०४ शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरुन झाले आहेत. राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होत आहेत. उर्वरित सुमारे ७१ लाख शेतकऱ्यांना येत्या १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज भरावे लागणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com