सांगलीत भाजीपाला उत्पादकांची सावध पावले

सांगलीजिल्ह्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव आणिलॉकडाउनच्याशक्यतेमुळेभाजीपाला लागवड करण्यासंदर्भातशेतकऱ्यांच्यात संदिग्धता निर्माण झाली असून त्यांनी सावध पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
सांगलीत भाजीपाला उत्पादकांची सावध पावले
सांगलीत भाजीपाला उत्पादकांची सावध पावले

सांगली : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाने आठवडा बाजार बंद केले आहेत. लॉकडाउन होण्याची भीती आहे. परिणामी, भाजीपाला लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्यात संदिग्धता निर्माण झाली असल्याने भाजीपाला रोपांच्या मागणीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला लागवड कमी झाली होती. कोरोना विषाणूनंतर तब्बल आठ ते नऊ महिन्यांनी आठवडा बाजार सुरू करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी बाजार समितीमध्ये भाजीपाला सौदे व्हायचे. हळूहळू भाजीपाल्यास मागणी वाढू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे भाजीपाला आगार उद्ध्वस्त झाला. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, आठवडा बाजार, किरकोळ विक्रेते फिरून भाजीची विक्री करू लागले. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित कोरोना विषाणूचा आढावा घेण्यात आला. २४ मार्चपासून जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शासनाकडून लॉकडाउन करण्याचा संदर्भात चर्चा सुरू झाली. परिणामी, भीती निर्माण झाली. सध्या तरी लॉकडाउनचा निर्णय झाला नसला, तरी त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला असल्याचे चित्र आहे. रोपांची मागणी झाली कमी भाजीपाला लागवड करण्यासाठी शेतकरी रोपवाटिकेत पंधरा ते महिन्यापूर्वी रोपे तयार करण्यासाठी ऑर्डर देतात. त्यानंतर रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती केली जाते. ती रोपे शेतकरी घेऊन लागवड करतात. परंतु बाजारपेठेत भाजीची कमी झालेली मागणी आणि दरात होणारी घसरण आणि लॉकडाउनची भीती, यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी शेताची तयारीच केली नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी रोपांची मागणी कमी झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी रोपवाटिकेकडे रोपांची मागणी केली होती, ती रोपे विकत घेऊन जाण्याच्या मनःस्थितीत नसल्याने रोपवाटिका मालकांनी सांगितले. . ..असा होतोय परिणाम

  •   आठवडा बाजार बंद असल्याने ५० टक्के भाजीपाला शिल्लक राहतो
  •   दरात घसरण झाल्याने भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
  •   मालाचा अपेक्षित उठाव होत नाही
  •   केवळ बाजार समितीत होते भाजीपाल्याची विक्री
  • प्रतिक्रिया... वाढत्या कोरोना विषाणूमुळे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यातच लॉकडाउनची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रोपांच्या मागणीत घट झाली आहे. - प्रकाश कदम, प्रविराम कृषी परिवार

    आठवडा बाजार बंद झाल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. मालाचा उठाव होत नसून शेतातच माल शिल्लक राहतो आहे. तो माल कुठे विकायचा असा प्रश्न आहेच. पुन्हा लॉकडाउन झाला तर उभारी येणार नाही. - केदार माने, भाजीपाला उत्पादक, कसबेडिग्रज, ता. मिरज

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com