प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१ पैकी सहा लोकसभा मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथील लढती रंगतदार बनल्या आहेत. आमदार अनिल गोटे, हर्षवर्धन जाधव, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. राजकीय उपद्रव्यमूल्य असलेले अपक्ष उमदेवार किती मते घेतात यावर युती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हान दिले आहे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने केलेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी गोटे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गोटे यांचा धुळे शहराच्या राजकारणावर प्रभाव आहे. याशिवाय धुळ्याच्या आसपास असलेल्या संपर्कामुळे गोटे ३० ते ३५ हजारांच्या आसपास मते घेतील, असा अंदाज आहे. त्यामुळे हा मतांचा खड्डा कसा भरून काढायचा? याची चिंता भाजपला आहे.

नाशिकमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शड्डू ठोकला आहे. कोकाटे हे शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. युतीत नाशिकची जागा भाजपने लढवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, ही जागा शिवसेनेकडे गेल्याने कोकाटे यांनी बंड केले आहे. नाशिकच्या सिन्नर परिसरात कोकाटे यांना मानणारा एक वर्ग आहे. हा वर्ग त्यांच्यासोबत गेल्यास त्याचा परिणाम शिवसेनेवर होऊ शकतो. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यात लढत आहे.

नंदूरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली आहे. डॉ. नटावदकर यांनी २००४ आणि २००९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या माणिकराव गावित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भाजपने नंदूरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज डॉ. नटावदकर हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. नंदूरबारमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामना आहे. 

औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी शिवसेनेसाठी अडचणीची ठरत आहे. जाधव हे ट्रॅक्टर चिन्ह घेऊन लढत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव हे कन्नडमधून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांच्या उमेदवारीमुळे मराठा मते विभागली जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल अशी लढत आहे. शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर नगरमध्ये संजीव भोर हे अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com