नगर जिल्ह्यात पराभव अनेकांच्या जिव्हारी

नगर जिल्ह्यात पराभव अनेकांच्या जिव्हारी
नगर जिल्ह्यात पराभव अनेकांच्या जिव्हारी

नगर ः लोकसभा निवडणुकात भाजप- शिवसेनाला भरभरुन मते मिळाली असताना विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामधील दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलेला दिसत आहे. त्यामुळे ‘नेमका का पराभव झाला, लोकांनी नाकारले की अंतर्गत पाडापाडी झाली’ याचे आता पराभूत उमेदवारांनी आत्मपरीक्षण सुरू केले आहे. असे असले तरी लोकसभेत मिळालेल्या आघाडीच्या भरवशावर बसलेल्यांना लोकसभा-विधानसभा निवडणुका पूर्णपणे वेगळ्या असल्याचे लोकांनी दाखवून दिले आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत शिर्डी व दक्षिण नगर या दोन्हीही लोकसभा मतदार संघात डॉ. सुजय विखे पाटील व सदाशीव लोखंडे विजयी झाले. केवळ विजयीच झाले नाही तर नगरमधून पावने तीन लाख व शिर्डीत सव्वा लाख असे मिळून चार लाखांची आघाडी दिली. 

नगरमधील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना नगर शहरातून ५० हजार, राहुरीतून ७० हजार, श्रीगोद्यातून ३० हजार, शेवगाव पाथर्डीतून साठ हजारांचे मताधिक्य होते. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदार संघात २४ हजारांचे लोकसभेला मताधिक्य होते. लोकसभेला भाजप-सेनेला मोठे मताधिक्य असल्याने खुशीत असलेल्या भाजप उमेदवारांना विधानसभेत मात्र लोकांनी धक्का दिला. 

पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेतील उपाध्यक्ष विजय औटी, माजी मंत्री आमदार शिवाजी कर्डीले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार वैभव पिचड, माजी मंत्री अनिल राठोड यांना पराभव पत्कारावा लागला. नगरमधून संग्राम जगताप यांनी लोकसभेतील पन्नास हजाराचे भाजपचे मताधिक्य तोडून अकरा हजाराने तर प्राजक्त तनपुरे यांनी ७० हजारांचे मताधिक्य तोडून २३ हजारांनी विजयी झाले. कोपरगावात आशुतोष काळे ७५० मताने निवडून आले तरी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी १५ हजार तर भाजपचेच विजय वहाडणे यांनी चार हजार मते घेतली. 

पाथर्डीत सुरवातीपासून भाजप नेत्यांनी विरोध करुनही मोनिका राजळे निवडून आल्या असल्या तरी लोकसभेपेक्षा यावेळी मताधिक्य घटले. रोहीत पवार लोकसभेतील २४ हजाराचे मताधिक्य तोडून ४२ हजारांनी निवडून आले. पारनेरमध्ये लोकसभेतील तीस हजारांचे मताधिक्य तोडलेच पण साठ हजाराने निलेश लंके जिंकले. अकोल्यात राष्ट्रवादीचे लोकसभेपेक्षा तीस हजार मते वाढली. श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते साधारण चार हजारांनी निवडून आले असले तरी लोकसभेपेक्षा यावेळी भाजपचे तब्बल चाळीस हजार मताधिक्य कमी झाले. यावेळी पहिल्यांदाच जिल्ह्यामधून शिवसेना हद्दपार झाली. या निवडणुकीत शरद पवार यांची जादू चालली असली तरी वर्षानुवर्ष मतदार संघावर प्रभाव असलेल्या नेत्यांचा पराभव का झाला? याचे आत्मपरीक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे ‘आपला पराभव’ शोधण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने या निकालावरुनच भविष्यातील राजकारण रंजक असणार असेच दिसून येत आहे.

कोणी कोणाचे काम केले?  नगर जिल्ह्याचे राजकारण तसे बेरकी. कोण कोणाचा राजकारणात गेम करेल याचा नेम नाही असे लोक बोलतात. लोकसभेतील मताधिक्य आणि विधानसभेत लागलेले निकाल याच मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणी कोणाचे काम केले, वरचे आणि आतले काम केले याबाबत आता गावगावांत चर्चा झडू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळातही जिल्ह्याचे राजकारण वेगवेगळ्या कारणाने चर्चेतच राहणार असल्याचे दिसून येत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com