भंडारा ः साकोली तालुक्यातील किन्ही येथे १९ शेतकऱ्यांच्या ३३ एकरातील धानाचे पुंजणे (ढिग) जाळण्याचा प्रकार घडला होता. या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यातील हस्ताक्षराची पडताळणी करून आरोपींचा माग काढला जाणार आहे.
पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्हयात धानाचे उत्पादन होते. धानाची काढणी मळणी झाल्यानंतर शेतकरी पुंजणे शेतात लावून ठेवतात. याच पुंजण्यांना पूर्व वैमन्यस्यातून आग लावण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. किन्ही शिवारात देखील रविवारी (ता.२१) मध्यरात्रीच्या सुमारास १९ शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजणे जाळण्यात आले होते. ३३ एकरातील कापणी केलेल्या या धानाची किंमत तब्बल ८ लाख २५ हजार रुपये आहे. अज्ञाताने या पुंजण्यांना आग लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी त्याच दिवशी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
गेल्या तीन दिवसांपासून आरोपीचा माग काढण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलिसांप्रती असंतोष निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाशी संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यात काही व्यक्तींची नावे नमूद आहेत. त्यातील एक व्यक्ती पुण्यात खासगी कंपनीत काम करतो, अशी माहिती समोर आली.
चिठ्ठीच्या आधारे शोध घेणाऱ्या पोलिसांनी आता हस्ताक्षराची पडताळणी करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता किन्ही गावातील संशयितांचे हस्ताक्षर नमुने घेण्यात येतील, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांना हवी मदत
जिल्हा परिषदेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. त्याविषयी अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यासोबतच शासनाने देखील एकरी २५ हजार रुपयांपर्यंत मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.