चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे महाबीज पुरविणार 

यंदाच्या हंगामात पीक काढणीदरम्यान सलग पाऊस झाल्याने सर्वच पिकांचा दर्जा खालावला होता. याची झळ शेतकऱ्यांना जशी बसली तसाच फटका बियाणे उत्पादक असलेल्या कंपन्यांनाही बसला.
soybean
soybean

अकोला ः यंदाच्या हंगामात पीक काढणीदरम्यान सलग पाऊस झाल्याने सर्वच पिकांचा दर्जा खालावला होता. याची झळ शेतकऱ्यांना जशी बसली तसाच फटका बियाणे उत्पादक असलेल्या कंपन्यांनाही बसला. यामुळे या हंगामासाठी बियाण्याची सहज उपलब्धता करणे कंपन्यांना सहज शक्य झालेले नाही. महाबीज सारख्या मोठ्या बियाणे पुरवठादार शासकीय उपक्रमाला हंगामासाठी बियाणे पुरवठा करताना काही तुट भरून काढण्यासाठी परराज्यातील बिजोत्पादकांची मदत घ्यावी लागत आहे. या अनुषंगाने लवकरच ई-निविदा प्रक्रीया सुरु केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्याचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. यंदाही बियाणे पुरविण्याचे नियोजन अंतीम झाले आहे. त्यानुसार गेल्या चार वर्षातील लागवड क्षेत्राचा सरासरी आढावा घेत चार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. सोबतच तुरीचे १० हजार क्विंटल, मूग ३ हजार क्विंटल, उडीद ११५०० क्विंटल, संकरीत ज्वारी ६ हजार, धान ७० हजार क्विंटल आणि कापसामध्ये बीटी वाण असलेल्या नांदेड ४४ व पीकेव्ही २ या दोन वाणांची साधरणतः एक लाख पाकीटे पुरविली जाणार आहेत.  यंदा सोयाबीनला अति पावसाचा फटका बसलेला आहे. महाबीज बीजोत्पादक शेतकरीही यातून सुटलेला नाही. दरवर्षी हंगामासाठी लागणारे बहुतांश बियाणे राज्यातील बिजोत्पादनातून उपलब्ध होत होते. यंदा मात्र यात तुट आलेली आहे. त्यामुळे बियाण्याची गरज पुर्ण करण्यासाठी महाबीज लवकरच ऑनलाईन ई-निवादा प्रक्रीया राबविणार असून याद्वारे बियाण्याची उपलब्धता करून घेतली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रीया केली जात आहे. हंगामात सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले तर बियाण्याची उणीव भासू नये यासाठी कृषी विभागाकडून घरचे बियाणे प्रक्रीया करुन वापरण्याबाबत आधीच जनजागृती सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नसल्याचाही दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.  हंगामासाठी हवे असलेल्या बियाण्याची ९० टक्के प्रोसेसिंग पुर्ण होत आलेली आहे. आता बियाण्याच्या वाहतुकीसाठी संबंधित प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी काढून पुरवठा सुरु केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी बंद असलेल्या वाहतुकीमुळे पुरवठा होऊ शकला नव्हता. आता मात्र ही प्रक्रीया सुरळीतपणे सुरु झाल्याचे सांगण्यात आले. 

महाबीजकडून असा होणार बियाणे पुरवठा (क्विंटलमध्ये)  सोयाबीनः ४ लाख  तूरः १० हजार  मूगः ३ हजार  उडीदः ११ हजार ५००  संकरीत ज्वारीः ६ हजार  धानः ७० हजार  कापूसः १ लाख पाकिटे (नांदेड ४४ व पीकेव्ही २)  खासगी कंपन्यांना राज्यात फटका  महाबीज प्रमाणेच राज्यात विविध बियाणे कंपन्यांकडून बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. यंदा या खासगी कंपन्यांना सोयाबीन व इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करून घेताना मोठी अडचण आलेली आहे. राज्याला जवळपास १६.५७ लाख क्विंटल बियाण्याची गरज असते. यामध्ये महाबीजकडून पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक पुरवठा केला जाईल. उर्वरित बियाणे राष्ट्रीय बियाणे महामंडळ व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. ही गरज पुर्ण करण्यासाठी कंपन्यांकडून इतर राज्यातून बियाणे आवक करण्याची वेळ यंदा आलेली आहे. दरवर्षी या कंपन्या इतर राज्यातील बियाणे आणत असतात परंतु यंदा महाराष्ट्रात झालेले मोठे नुकसान पाहता त्यांची ही गरज दरवर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. इतर राज्यांवर खासगी कंपन्यांना अधिक अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांचे बियाणे कदाचित महाग झालेले दिसू शकते. अद्याप दर जाहीर झालेले असून पुढील काही दिवसात दरांचे चित्र स्पष्ट होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com