देशात सोयाबीनचा पेरा ११ टक्क्यांनी वाढला

देशातील सोयाबीन लागवड
देशातील सोयाबीन लागवड

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तेलबियांचे त्यातही सोयाबीनचे उत्पादन वाढल्याने दराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्राने खाद्यतेल आयात शुल्क वाढ करून दर वाढविण्यााच प्रयत्न केला. मात्र तरीही त्याचा परिणाम दरावर झाला नाही. त्यामुळे यंदा तेलबिया पेरणी कमी होईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सोयाबीनचा पेरा ११ टक्क्यांनी वाढून ९३.५ लाख हेक्टरवर झाला आहे. मागील वर्षी याच काळात ८४.६३ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.  देशात मागील हंगामात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा १२०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करून दर वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दर पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाही. त्यातच महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सरकारी खरेदीचा गोंधळ उडाला होता. महाराष्ट्रात तर शासकीय खरेदीतील अनंत अडचणींनी शेतकऱ्यांना आपला माल बाजारात विकता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून होते आणि शेवटी त्यांना ते कमी दरात व्यापाऱ्यांना विकावे लागले. सर्वच राज्यांमध्ये जवळपास हीच परिस्थिती होती. त्यातही शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही पूर्णपणे दिले गेले नाही. मागील हंगामातील या अनेक अडचणींमुळे यंदा सोयीबीनखालील क्षेत्र कमी होईल असा कयास बांधला जात होता. 

उत्पादक पट्ट्यात चांगला पाऊस  देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली ज्यामुळे पेरणी वाढली आहे. मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा ६ टक्के अधीक पाऊस तर महाराष्ट्रात ३३ टक्के आणि राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला आहे. या राज्यांतील सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये पेरणीस आवश्यक पाऊस झाल्याने पेरण्या उरकून घेतल्या. तसेच पावसाचा लहरीपणाचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या सोयाबीनला यंदाही पसंती दिली आहे.

उत्पादक राज्यांमध्ये मोठी वाढ सोयीबीन पेरणीत देशात अग्रेसर असलेल्या मध्य प्रदेशात मागील हंगामात ४०.१२ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. त्यात यंदा ११ टक्क्यांनी वाढ होऊन आतापर्यंत ४४.४१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. महाराष्ट्रातही सोयाबीन पेरणीत ७ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ३० लाख हेक्टरवर सायबीनची पेरणी झाली होती. सध्या ३२.१२ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. राजस्थानमध्येही सोयाबीनमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतार्यंत ९.४५ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून मागील वर्षी याच काळात ७.८६ लाख हेक्टरवर सोयाबन होते. कर्नाटकात यंदा ३७ टक्के सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ झाली असून अातापर्यंत ३.१५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.  हमीभाववाढीचाही परिणाम मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळाला नाही तरीही यंदा केंद्राने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ३४९ रुपये वाढ करून ३३९९ रुपये केला आहे. मागील वर्षी सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी वाढवली, असे केंद्राने म्हटले आहे. तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनची पेरणी चालणार आहे. मात्र, या वेळी पेरणी केल्यास उत्पादनात घट येऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com