राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊस

यंदा हवामान विभागाने चांगल्या पाऊस मानाचे संकेत दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. मॉन्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत होता असेच जाणवते.
राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊस
राज्यात यंदा सोळा टक्के अधिक पाऊस

यंदा हवामान विभागाने चांगल्या पाऊस मानाचे संकेत दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. मॉन्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत होता असेच जाणवते. विशेषत: सह्याद्रीच्या पट्ट्यात येणारा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात प्रारंभीपासून मॉन्सूनचा जोर नेहमी सारखा नव्हता. विदर्भातही काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती होती. अवर्षणप्रवण मराठवाड्यावर यंदा पावसाने अधिकची मेहेरबानी केली. कोकण,विदर्भात व मध्य महाराष्ट्रात नद्या तशा बहुकाळ प्रवाही राहिल्या नाहीत. धरणे भरले असली तरी मराठवाडा वगळता राज्यात भूजलसाठा अधिक वाढण्यास पूरक पाऊसमान नव्हता. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या १००४.२ मिलिमीटरपैकी ११६५.० मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पाऊस पडला. यंदा नगर जिल्हयात सर्वाधिक ७८ टक्के अधिक तर भंडारा जिल्हयात सर्वात कमी उणे ४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  असा पडला पाऊस  यंदा हवामान विभागाने पहिल्या टप्यांत जाहीर अंदाजामध्ये १०० टक्के, तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या अंदाजामध्ये १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. चालू वर्षी मॉन्सून वेळेत १ जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर हळूहळू मॉन्सूनने वाटचाल करत संपूर्ण राज्यभर व्यापला. यंदा जून, जुलैमध्ये काही वेळा पाऊस कमी-अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती आढळून आली. मात्र २ ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. चार ऑगस्टपासून प्रत्यक्षात धुव्वाधार पाऊस बरसण्यास सुरवात झाली. ५ ऑगस्ट रोजी पालघर येथे हंगामातील सर्वाधिक ४६०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात हा पाऊस पडत राहिला. एकंदरीत जून, जुलै महिन्यात पडलेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात यंदा सर्वाधिक पाऊस दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाच्या सुरवातीच्या काळात बऱ्यापैकी पुरेसा पाऊस झाला. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी ऑगस्टअखेरपर्यत मराठवाडा धरणांतील पाणीपातळी खालावलेलीच होती. तीन महिन्यातील पावसाची कसर सप्टेंबरमध्ये भरून निघाल्याने मराठवाड्याला चांगलाच दिलासा मिळाला. गेल्या चार महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या ६६८.८ मिलिमीटरपैकी ८६६.१ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. औरंगाबादमध्ये सरासरीच्या ५८१.८ मिलिमीटरपैकी ९५५.६ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या ६४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस हिंगोली व नांदेड जिल्हयात पडला असला तरी सरासरीच्या तुलनेत ८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सरासरीपेक्षा अधिकपाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस ः यंदा जून, जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. त्यातच घाटमाथ्यावरही पाऊस न पडल्याने बहुतांशी धरणे जुलैअखेरपर्यंत कोरडी होती. मात्र, सुरवातीला कमी झालेल्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार हजेरी लावली. चार महिन्याच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ७५१.२ मिलिमीटरपैकी ९६६.६ म्हणजेच २९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये नगरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. सरासरीच्या ४४८.१ मिलिमीटरपैकी ७९७.९ मिलिमीटर म्हणजेच ७८ टक्के अधिक पाऊस पडला. तर सातारा जिल्हयात कमी म्हणजेच सरासरीच्या सहा टक्के अधिक पाऊस पडला. खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार म्हणजेच १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूरमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे गंगापूर, दारणा, कोयना, राधानगरी, खडकवासला, भंडारदरा, मुळा उजनी, भाटघर अशी अनेक धरणे भरून वाहू लागली. कोकणात पावसाचा जोर कमी  कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी चालू वर्षी या भागात कमी पाऊस पडला आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मात्र, अनेक वेळा उघडीप दिल्याने चार महिन्यात कोकणात सरासरीच्या २८७५.३ मिलिमीटरपैकी ३६६२.७ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत २७ टक्के अधिक पाऊस पडला. यामध्ये पालघर रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडला. मुंबईत सरासरीच्या २०२१.४ मिलिमीटरपैकी ३२०२.८ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ५८ टक्के अधिक पाऊस पडला. सिंधुदुर्गमध्ये ५३ टक्के अधिक पाऊस पडला असून पालघरमध्ये सर्वात कमी म्हणजेच १३ टक्के अधिक पाऊस पडला. विदर्भात पावसाची हुलकावणीच विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जून, जुलैमध्ये विदर्भात चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला होता. एक ते ३० सप्टेंबर याकालावधीत विदर्भात सरासरीच्या ९४३.१ मिलिमीटरपैकी ८५१.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत उणे १० टक्के कमी पाऊस पडला. वाशीम, नागपूर, बुलडाणा जिल्हयात सरासरीहून अधिक पाऊस पडला. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, यवतमाळमध्ये शेवटच्या टप्यांत पूर्व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी उणे शंभर टक्केच्या आत नोंद राहिली.  

एक जून ते ३० सप्टेंबरअखेर जिल्हानिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः स्त्रोत - हवामान विभाग
विभाग   सरासरी पाऊस  प्रत्यक्ष पडलेला पाऊस  पावसाची तफावत, टक्केवारीमध्ये
मुंबई शहर  २०२१.४  ३२०२.८   ५८
पालघर   २३०५.४  २६०१.५ १३
रायगड   ३१४८.७   ३६३०.९   १५
रत्नागिरी   ३१९५.१   ३९५३.८  २४
सिंधुदुर्ग   २९४०.५  ४४८५.४  ५३
ठाणे   २४३३.४   २८८२.०   १८
नगर   ४४८.१   ७९७.९   ७८
धुळे   ५३५.१   ७८८.३   ४७
जळगाव   ६३२.६   ७८४.३   २४
कोल्हापूर   १७३३.१   २१३२.३   २३
नंदुरबार   ८६०.४   ९४४.०   १०
नाशिक   ९३३.८   ११०७.७   १९
पुणे   ८६१.५   १२०२.६   ४०
सांगली   ५१४.५   ६४९.७   २६
सातारा   ८८६.२  ९४२.५   ६
सोलापूर   ४८१.१   ६०१.२  २५ 
औरंगाबाद   ५८१.८   ९५५.६   ६४
बीड   ५६६.१  ८२४.१   ४६
हिंगोली   ७९५.३   ८५६.६   ८
जालना   ६०३.१   ८३५.७   ३९
लातूर   ७०६.०   ९०८.८   २९
नांदेड   ८१४.३   ८८३.१   ८
उस्मानाबाद   ६०३.१   ७४४.३   २३
परभणी   ७६१.३  ९०६.६   १९
अकोला   ६९३.८   ५०४.५   उणे २७
अमरावती   ८६२.०   ६९३.७   उणे २०
भंडारा   ११५७.०   ११०७.१   उणे ४
बुलडाणा   ६५९.४   ६९३.७   ५
चंद्रपूर   १०८३.९   ८८८.८   उणे १८
गडचिरोली   १२५४.२   ११५५.९   उणे ८
गोंदिया  १२२०.२   ११२०.९   उणे ८
नागपूर  ९२०.४   ९८२.४   ७
वर्धा   ८७४.५   ८०७.५   उणे ८
वाशीम   ७८९.०   ९१२.७   १६
यवतमाळ   ८०५.०   ६१३.०   उणे २४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com