नगर जिल्ह्यात पावसाने कापूस पट्ट्यात मोठे नुकसान

नगरमध्ये मागील दहा वर्षांत अनेक वेळा दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा नगर जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात चांगला पाऊस झाला. मात्र, दर वर्षीप्रमाणे यंदाही कापूस पट्ट्यात जास्तीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
प्रातिनिधी छायाचित्र
प्रातिनिधी छायाचित्र

नगर  : मागील दहा वर्षांत अनेक वेळा दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा नगर जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात चांगला पाऊस झाला. मात्र, दर वर्षीप्रमाणे यंदाही कापूस पट्ट्यात जास्तीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे ५० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार यंदा कापसाच्या नुकसानीमुळे सुमारे सहा ते सात लाख क्विंटल कापसाचे नुकसान झाले असून, साधारण सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.  नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात उसाचे क्षेत्र अधिक असते, तर दक्षिणेतील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत भागात खरिपात कापसाचे क्षेत्र अधिक असते. अलीकडच्या काळात उत्तरेतील राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा भागातही कापसाची लागवड होऊ लागली आहे. गेल्या दहा वर्षांत अनेक वेळा कापूस पट्टा असलेल्या भागात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने कापसाचे लागवड क्षेत्र वाढले. सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. मात्र ऐन कापूस वेचणीच्या काळातच दोन महिने जोरदार पाऊस पडला. अनेक भागात सलग पंचवीस ते तीस दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे साचलेल्या पाण्याने कपासी सडली. वेचणीला आलेला कापूस भिजून काळा पडला शिवाय न फटलेली कापसाची बोंडेही जागेवर सडली. त्याचा मोठा फटका यंदा बसणार आहे.  प्रशासनाच्या माहितीनुसार यंदा पावसाने ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्ती नुकसान झाले आहे. जाणकारांच्या माहितीनुसार कापसाचे एकरी ८ ते १० क्विटंल म्हणजे २० ते २२ क्विंटल उत्पादन होत असते. यंदा साधारण चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे एकरी ४ ते ५ क्विटंलपेक्षा कमी उत्पादन हाती येणार आहे. त्यामुळे सुमारे यंदा कापसाचे सहा ते सात लाख क्विंटलपेक्षा अधिक नुकसान निश्चित असल्याने कापसाच्या सरकारी बाजार भावानुसार कापूस उत्पादकांना साडेतीनशे ते चारशे कोटीपेक्षा अधिक फटका बसणार आहे. त्यामुळे दर वर्षी दुष्काळामुळे कापसाचे नुकसान होत असते. यंदा अधिक पावसाने कापूस पट्ट्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. प्रशासनाकडून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे केला जातात, मात्र ३३ टकक्यांच्या आतही सुमारे वीस ते पंचवीस हजार हेक्टरला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया दर वर्षी दुष्काळाने तर यंदा अति पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून  कापूस उत्पादकांच्या मागे असलेली संकटाची मालिका यंदाही कायम आहे. झालेले नुकसान पाहता कापूस उत्पादकांना किमान हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळणे गरजेचे आहे.  - प्रमोद तांबे , शेतकरी, बोधेगाव ता. शेवगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com