शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा: मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता आपणास संपवावी लागेल. त्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक परिपूर्ण आराखडा आपण तयार करावा.
joint agresco
joint agresco

अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता आपणास संपवावी लागेल. त्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक परिपूर्ण आराखडा आपण तयार करावा, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (ता.२७) पासून संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक सुरु झाली. या बैठकीचे ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की शेतकरी पिकवतो पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. यासाठी आपण ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना पुढे आणली. बोलायला हे सोपे आहे. पण ही संकल्पना खूप मोठी आहे. त्याच्या उत्पादनाला मार्केटिंगची जोड गरजेची आहे. आपल्याला शेतीला उद्योगाच्या बरोबरीने आणावे लागेल. शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी आहे. कृषी विद्यापीठाची भूमिका खूप मोठी आहे. विद्यापीठांनी एक आराखडा तयार करावा. आपली तयारी असेल तर मी महिन्याला एक दिवस आपणास देईल

कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, की विकेल ते पिकेल ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी तसे वाण तयार करावे. राज्यात चारही कृषी विद्यापीठांनी चांगले काम केले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी. आपण करीत असलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. बदलते हवामान हे आता शेतीत मोठे आव्हान बनले आहे, याकडे लक्ष द्यावे. या अनुषंगाने नवीन वाण निर्मिती, दर्जा व बियाणे उपलब्धता यादृष्टीने संशोधन करावे.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. भाले यांनी केले. उद्घाटन सत्राचे आभार कृषी व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरीहर कौसडीकर मानले.

महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी विद्यापीठाकडे चक्राकार पद्धतीने या महत्त्वाकांक्षी सभेचे यजमानपद असते. यंदा ही जबाबदारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आहे. पाच दिवस चालणाऱ्या कृषीच्या या महाकुंभात राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पीक वाण, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारशी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा व सुधारणांसह प्रसारित करण्यात येणार आहे. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण २०८ शिफारशी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत. यामध्ये १६ पीक वाण, १२ यंत्रे व अवजारे तर १८० पीक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

‘जॉइंट ॲग्रेस्को’च्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री दादा भुसे होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री बच्चू कडू, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा (राहूरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एस. ढवण (परभणी),  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत (दापोली), तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम.भाले सहभागी झाले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com