`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या कोर्टात

`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या कोर्टात
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या कोर्टात

पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण कामकाजाच्या गैरव्यवहाराची तक्रार गृह विभागाकडे करण्यात आली आहे. ही तक्रार आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकांकडे पाठवण्यात आली आहे. याबाबत ते कोणती भूमिका घेतात, याकडे कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

गृह विभागाचे अवर सचिव दीपक पोकळे यांनी महासंचालकांकडे एकूण १५ तक्रारी मूळ प्रतिंसह पाठविल्या आहेत. कृषी विभागाच्या गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या तक्रारीसोबत काही पुरावेदेखील जोडण्यात आलेले आहेत.  

“सरकारी योजनांशी संबंधित भ्रष्टाचार अथवा शासकीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या गैरव्यवहार व अपसंपदेबाबत आलेल्या तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी आपणाकडे पाठविल्या आहेत. तक्रारदारांनी नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी,” अशी सूचना महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. 

“नियमानुसार झालेली कार्यवाही अर्जदारास कळवावी. तसेच, ज्या प्रकरणात आवश्यकता वाटते अशा प्रकरणाचे अहवाल शासनाला सादर करावे,” असे देखील गृह विभागाने नमूद केले आहे.  गृह विभागाकडे वसंत मुंडे यांनी केलेल्या तक्रारीत गुणनियंत्रण विभागाच्या संबंधित गंभीर स्वरूपाचे आठ मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराची विस्तृत वृत्तमालिका ‘ॲग्रोवन’मधून प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यानंतर विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी राज्य शासनाला पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. “गुणनियंत्रण विभागातील घोटाळ्याबाबत विखे व शेट्टी यांना अद्याप चौकशीचे अहवाल पाठविण्यात आलेले नाहीत. मुंडे यांच्या चौकशीच्या मागणीवर देखील अजून अंतिम कार्यवाही झालेली नाही. कृषी विभागाने नियुक्त केलेल्या घावटे समितीचा अहवालदेखील मंत्रालयाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी नेमकी कोणत्या टप्प्यात आहे हे आताच स्पष्ट करता येणार नाही,” अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  

विखेंऐवजी आता मुंडेंकडून पाठपुरावा गुणनियंत्रण विभागातील घोटाळ्याबाबत पाठपुरावा करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात गेले. त्यामुळे या घोटाळ्याबाबत पाठपुरावा त्यांनी थांबविल्याने कृषी विभागातील सोनेरी टोळीने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुणनियंत्रणाचा मुद्दा हाती घेतला आहे. “विधिमंडळात या गैरव्यवहाराबाबत मुंडे यांनी काही लेखी मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे सरकारला उत्तर तयार करून देण्यासाठी कृषी विभागात चांगलीच धावपळ सध्या सुरू आहे,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com