बोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन फायद्याचे

मत्स्य बोटुकलींचे जगवणुकीचे प्रमाण अधिक असते.
मत्स्य बोटुकलींचे जगवणुकीचे प्रमाण अधिक असते.

मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार करण्यात आलेले मत्सजिरे अतिशय नाजूक असतात. त्यांच्या संगोपनाकरिता योग्य काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. बोटुकली आकाराच्या माशांमध्ये रोगप्रतिकारक व ताण सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने माशांच्या जगवणुकीचे प्रमाण अधिक राहते अाणि अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे बोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन करणे फायद्याचे अाहे. विविध जातींच्या माशांचे संवर्धन वेगवेगळ्या अाकाराच्या तलावात करता येते. त्यांच्या विविध संगोपन पद्धती अाहेत. या माशांचे मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजनन घेता येते. व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या मत्स्यजाती व त्यांची ओळख १. कटला ः या माशांचे डोके मोठे मधला भाग मांसल व रुंद असून, अंगावर मोठी खवले असतात. तोंड वरच्या बाजूस वळलेले, खालचा ओठ जाड व किंचित पुढे आलेला असतो. मिशा नसतात. वरच्या थरातील प्राणिप्लवंग हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा सर्वांत जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. २. रोहू ः शरीर लांबट असून, अंगावर लालसर खवले असतात. खालचा ओठ जाड असून, त्याची किनार मऊ व दातेरी असते. वरच्या जबड्यास २ लहान मिशा असतात. मूळचा उत्तर भारतातील नद्यांमधील हा मासा आता भारतात सर्वत्र आढळतो. मधल्या थरातील प्राणिप्लवंग, कुजलेल्या वनस्पती व त्यावरील जीवजंतू हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात ३-४ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. ३. मृगळ ः शरीर जास्त लांबट असते. ओठ पातळ, खालच्या जबड्यास २ लहान मिशा असतात. मूळचा उत्तर भारतातील नद्यामधील हा मासा आता भारतात सर्वत्र आढळतो. तळावरील प्राणिप्लवंग, कुजलेल्या वनस्पती व हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात १-२ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. ४. चंदेरा ः डोके निमुळते व मधला भाग चपटा असून, अंगावर चंदेरी खवले असतात. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित पुढे आलेला असतो. पोटावर चाकूच्या पात्याप्रमाणे मांसल भाग असतो. वरच्या थरातील वनस्पती प्लवंग व शेवाळ हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपेक्षा जास्त वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजनन घेता येते. ५. गवत्या ः शरीर लांबट असून, अंगावर हिरवट खवले असतात. तोंड निमुळते व अरुंद असते. मिशा नसतात. पृष्ठपर बराच मागे असतो. शेपटीचा पर पूर्ण दुभागलेला नसून त्याची कड अंतर्गोल असते. हा मासा मूळचा चीनमधला. मधल्या थरातील वनस्पती प्लवंग व पाणवनस्पती हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपेक्षा जास्त वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. ६. सायप्रिनस ः काळपट, हिरवट, पिवळसर, लालसर, सोनेरी अशा विविध रंगांत आढळतो. याच्या तोंडाची विशिष्ट अशी ठेवण असून, ते खाद्य खाण्यासाठी लांबवता येते. वरच्या व खालच्या जबड्यास मिळून ४ लहान मिशा असतात. पृष्ठपर लांब असतो. अंगावरील खवल्यांवरून स्केल, मिरर अाणि लेदर अशा ३ पोटजाती पडतात. बोटुकली आकाराचे मत्स्यबीज

  • अंड्यातून बाहेर आलेल्या बीजाचा आकार ६ ते ८ मि.मी. असतो. त्यास मत्स्यजिरे म्हणतात. १० दशलक्ष मत्स्यजिरे प्रतिहेक्‍टरप्रमाणे संगोपन तलावात संचयन करून त्याची १२ ते १५ दिवसांत २० ते २५ मि.मी. वाढ करण्यात येते, यास मत्स्यबीज म्हणतात.
  • हे मत्स्यबीज पुढील वाढ करण्यास १.५ दशलक्ष मत्स्यबीज प्रतिहेक्‍टर प्रमाणे संवर्धन तलावात सोडले जातात. २५ ते ५० मि.मी. आकाराच्या बीजास अर्धबोटुकली म्हणतात. ५० मि.मी. च्या वरील बीजास बोटुकली म्हणतात.
  • संगोपन तलाव साधारणतः ०.०१ ते ०.१० हेक्‍टर क्षेत्राच्या १.५ मीटर खोली असलेला तलाव संगोपनास योग्य असतो. यामध्ये १० दशलक्ष मत्स्यजिरे/ हेक्‍टरप्रमाणे संचयन करून त्याचे संगोपन करून मत्स्यबीज उत्पादन केले जाते. मत्स्यजीऱ्यापासून मत्स्यबीज संवर्धनास १२ ते १५ दिवस लागतात. प्रमुख कार्प हंगामात २ वेळा व सायप्रिनस हंगामात २ वेळा संगोपन करून वर्षामध्ये ४ वेळा संगोपन करता येणे शक्‍य असते. संवर्धन तलाव साधारणतः ०.०१ ते ०.२० हेक्‍टर क्षेत्राच्या १.५ मीटर खोली असलेला तलाव संवर्धनास योग्य असतो. यामध्ये १.५ दशलक्ष मत्स्यबीज/ हेक्‍टरप्रमाणे मत्स्यबीज संचयन करून त्याचे संवर्धन करून बोटुकली उत्पादन केले जाते. मत्स्यबीजापासून बोटुकली संवर्धनास ४५ ते ६० दिवस लागतात. त्यामुळे प्रमुख कार्प हंगामात १ वेळा सायप्रिनस हंगामात १ वेळा संगोपन करून वर्षातून २ वेळा संवर्धन करता येते. खत व्यवस्थापन

  • मत्स्यजिरे संचयन करण्यापूर्वी ५ दिवस आधी तलावात पाणी घेऊन त्यामध्ये ३०० किलो/ हेक्‍टर सुपरफॉस्फेट व ७०० किलो किलो शेंगदाणा पेंड सर्वत्र पाण्यात मिसळावी.
  • मत्स्यबीज सोडण्यापूर्वी एक आठवडा अगोदर १००० किलो हेक्‍टर ताजे शेण, ५० किलो/ हेक्‍टर युरिया व ५० किलो/ हेक्‍टर सुपर फॉस्फेट खत मिसळावे. बीज सोडल्यावर पुढील महिन्यात याच प्रमाणे खत द्यावे.
  • मत्स्यजिरे संचयन करण्यापूर्वी किमान २ दिवस आधी माती/ पाणी/ खाद्य प्रोबायोटिक्‍स (उदा. एनव्हिरॉन ऐसी) २५ किलो/ हेक्‍टरची मात्रा दिल्यास तलावाच्या तळावर जमा होणाऱ्या न वापरलेल्या खत व खाद्याचे विघटन होऊन तलावाचा तळ स्वच्छ राहतो.
  • पाण्याची पातळी कमी झाल्यास अथवा खतामुळे पाण्याचा रंग जास्त हिरवा होऊन त्यावर दाट तवंग जमत असल्यास बीज प्राणवायूची कमतरता निर्माण होऊन मरण्याची शक्‍यता असते. असे लक्षण दिसताच खते देणे थांबवावे. पाणी बदलावे. तलावातील बीज बाहेर जाणार नाही व बाहेरचे मासे आत येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.
  • पूरक खते मत्स्यजिरे संचयनानंतर शेंगदाणा पेंड वापरून खालीलप्रमाणे पूरक खते द्यावीत. शेंगदाणा पेंड भिजवून सर्वत्र पाण्यात मिसळावी.

  • मत्स्यजिरे संचयनानंतर ३ रा दिवस १७५ किलो/ हेक्‍टर
  • मत्स्यजिरे संचयनानंतर ४ था ते ६ दिवस ६० किलो/ हेक्‍टर
  • पाण्याचा रंग जास्त हिरवा होऊन त्यावर दाट तवंग जमत असल्यास खते देणे थांबवावे.
  • पूरक खाद्य पूरक खाद्य म्हणून शेंगदाणा पेंड व २ टक्के व्हिटॅमिन व मिनरल मिक्‍स मिसळून वापरावे. मत्स्यजिऱ्यांसाठी खालीप्रमाणे पूरकखाद्य दररोज द्यावे. तसेच, आठवड्यातून दोन वेळा प्रोबायोटिक ५ ग्रॅम/ किलो पूरकखाद्य या प्रमाणे वापरावे.

  • पहिला ते पाचवा दिवस ः २८० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस
  • सहावा ते दहावा दिवस ः ४२० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस
  • अकरावा ते पंधरावा दिवस ः ५६० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस
  • दोन आठवड्यांनंतर उत्तम, सशक्त मत्स्यबीज मिळते. मत्स्यजिऱ्यापासून मत्स्यबीज मिळण्याचे प्रमाण ३०-३५ टक्के असते. तर, मत्स्यबीजापासून बोटुकली मिळण्याचे प्रमाण ५० टक्के असते. परिस्थितीच्या चढउतारामुळे हे प्रमाण कमी - जास्त असते.
  • शेततळ्यात मत्स्य बोटुकलीची निर्मिती ः

  • १० गुंठे किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या शेततळ्यात ५० ते १५० मि.मी. आकाराच्या बोटुकलीचे संचयन केल्यास मत्स्यबीज बेडूक, वाम, साप इ. भक्षक प्राण्यांची शिकार होणार नाहीत.
  • कार्प माशांची पावसाळ्यात पैदास होते. मात्र, भौगोलिक परिस्थितीनुसार सगळीकडेच पाऊस पडतोच, असे नाही, त्यामुळे शेततळ्यात पाणी असेलच असे नाही. जसा जसा पाऊस पडतो व शेततळी भरतात त्याप्रमाणे मत्स्यबीजाची मागणी वाढत जाते. मात्र, त्या वेळी मत्स्यबीज पैदास केंद्रात बीज उपलब्ध असेलच असे नाही. शेततळ्यांचा आकार लक्षात घेता प्रतिशेतकऱ्याला २००० ते ४००० नग मत्स्यबोटुकली बीजाची आवश्‍यकता असते. मात्र, त्यासाठी फिरावे लागते अाणि खर्चही जास्त येतो. शिवाय बीज वाहतूक करताना मरतूक होण्याचीही शक्‍यता असते. या सर्व बाबी लक्षात घेता, एका विशिष्ट भागामधील, उदा. गाव/ तालुका इ. शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात मत्स्यबीज केंद्रातून मत्स्यजिरे आणून ४५-६० दिवस आकाराने लहान शेततळ्यात संगोपन केल्यास बोटुकली आकाराचे मत्स्यबीज तयार होते. बोटुकली आकाराच्या बीजाला मागणीही खूप असते; शिवाय दरही चांगला मिळतो. मत्स्यजिऱ्यांचा खरेदी दर २,००० ते ३,००० प्रतिलक्ष आहे; तर विक्री दर किमान रु. २ प्रतिनग एवढा मिळू शकतो.
  • साधारणपणे १०,००,००० हेक्‍टर या दराने ५ गुंठे शेततळ्यात ५०,००० ते १,००,००० नग मत्स्यजिऱ्यांची साठवणूक करून ३० टक्के जगवणुकीचे प्रमाण गृहीत धरल्यास किमान १५ हजार मत्स्यबोटुकली दोन महिन्यांच्या संवर्धनातून मत्स्यबीज म्हणून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात व त्याद्वारे किमान ३० हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. जगवणुकीचे प्रमाण अधिक मिळविल्यास उत्पन्नात त्याप्रमाणे वाढ होऊ शकते.
  • संपर्क ः   रवींद्र बोंद्रे,  ०२२ - २६५१६८१६ (तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com