गोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय माश्यांचे प्रमाण वाढते.सध्या सर्वत्र माश्यांचे प्रमाण खूप वाढलेले असते. माश्यांचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर जनावरांचे लक्ष विचलित होते. जनावरांच्या खाद्य व खाण्यावर परिणाम होऊन त्यांच्या वजनात घट होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन शेवटी दुग्धोत्पादनात घट होते. म्हणून गोठ्यातील माश्यांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कीटकवर्गीय माश्यांचे प्रकार
चावणाऱ्या किंवा रक्त शोषणाऱ्या माश्या (गो माशी) चावा न घेणाऱ्या माश्या (घरगुती माशी) मादी माशी आपल्या उगमस्थानावर, ओलसर ठिकाणी अंडी घालते.गोठ्यातील तापमान आणि आर्द्रतेमध्ये अंड्याची वाढ होऊन अर्भके तयार होतात. अर्भक अवस्था गोठ्यातील घाण साचलेले पाणी,नाली,शेणाच्या ढिगारामध्ये,साचलेल्या पाण्याच्या जागेवर आढळते.ठराविक कालावधीमध्ये अळी कोषावस्थेत जाते. त्यानंतर कोशातून बाहेर पडते. कीटकवर्गीय माश्यांचे जनावरांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
शरीरातील आवश्यक घटक मूलद्रव्याचे प्रमाण कमी होऊन शरीर प्रक्रिया मंदावते. हार्मोन्सचे संतुलन बिघडते. पशू प्रजनन संस्थेवर परिणाम होऊन प्रजनन क्षमता कमी होते. वजन घट होणे,शरीरावर ताण येतो. शेवटी प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होतो. सातत्याने गोठ्याची स्वच्छता करावी. गवतपट्टा उन्हाळ्यामध्ये जाळावा. त्यामुळे अंड्यासहित इतर अवस्थांचा नायनाट होतो. कुरण व पिकाखालील जमिनीची अदलाबदल करावी. शेणाच्या ढीगाभोवती स्वच्छता ठेवावी. शेणाचा ढिगारा गोठ्यापासून दूर व झाकलेला असावा. त्यापासून गोठ्याभोवती माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. मुक्त संचार गोठा पद्धतीचा दुधाळ जनावरांसाठी वापर करावा. माश्यांची उत्पत्ती नाला, घाण पाण्यात होते. त्यामुळे तेथे शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. गोठ्या सभोवतालच्या नाली बंदिस्त असाव्यात. नाल्यांचा उतार व्यवस्थित असावा, जेणेकरून तो वाहता राहील. नाला नियमितपणे साफ करावा. गोठ्यातील मलमुत्राची योग्य ती विल्हेवाट लावावी. पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचे खाचखळगे असल्यास त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. सुधारित पद्धतीच्या गोठ्यामध्ये सूर्योदय, सूर्यास्तावेळी पंखा लावल्यास माश्या चावण्याचे प्रमाण कमी होते. संपर्क- डॉ. कल्याणी सरप,९०९६८७०५५० (कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ)