साडेचौदा टन केशर, बदामी आंबा समुद्रामार्गे इंग्लंडला निर्यात

बॉम्बे फ्रूट्स अॅण्ड व्हेजिटेबल्स इम्पोर्ट-एक्स्पोर्ट प्रा.लि. या कंपनीच्या बॉम्बे एक्स्पोर्ट्स या ब्रँडखाली हे आंबे निर्यात करण्यात आले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरवात करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास सर्वच निर्यातदार व्यापाऱ्यांसाठी लांब पल्ल्याच्या जलवाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. अपेडा आणि राज्य पणन मंडळाचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले. - प्रीतेश शेजवळ, आंबा निर्यातदार, मुंबई.
समुद्रमार्गे आंबा निर्यात
समुद्रमार्गे आंबा निर्यात

मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे टिकवणक्षमता वाढवता येणाऱ्या आधुनिक तंत्राच्या साह्याने मुंबईहून पहिल्यांदाच जलवाहतुकीद्वारे साडेचौदा टन केशर आणि बदाम आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त हवाई वाहतुकीमार्गे आंबा निर्यात केला जात होता. या नव्या तंत्रामुळे निर्यातदारांना दीर्घ अंतरावरील जलवाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. 

कंट्रोल अॅटमॉस्फियर रिफर टेम्प्रेचर या वातावरण नियंत्रित करणाऱ्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कंटेनरमधील कार्बनडाय ऑक्साईड आणि ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित केले जाते. त्यामुळे आंबा पक्व होण्याचा काळ नियंत्रित होऊन फळाची टिकवणक्षमता वाढवली जाते. आंबा काढणीनंतर खाण्यायोग्य असेपर्यंत पंधरा दिवसांचा काळ गृहीत धरला जातो. हवाई वाहतुकीमार्गे पाठवला जाणारा आंबा लवकर पोचतो. त्यासाठी या प्रक्रियेची आवश्यकता भासत नाही. 

मुंबईहून इंग्लंडला जल वाहतुकीमार्गे आंबा पोचण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी जातो, अशा लांब पल्ल्याच्या, दीर्घकालीन वाहतुकीचा विचार करून जहाजामार्गे आंबा पाठवायचा असेल तर, त्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. जेणेकरून आंबा पोचल्यानंतर ते फळ खाण्यायोग्य अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोचवता येते. या सगळ्या प्रक्रियेत आंब्याच्या दर्जावर कोणताही परिणाम होत नाही. फळाची चव, दर्जा कायम राहतो. या आधुनिक तंत्राचा वापर करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून पहिल्यांदाच आंब्याचा कंटेनर रवाना झाला.

सध्या गुजरातचा केशर आणि आंध्र प्रदेशचा बदामी आंबा पाठवण्यात आला आहे. दोन्ही मिळून सुमारे साडेचौदा टन आंबा इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरवात करण्यात आली आहे. आंब्याच्या हवाई वाहतुकीला मोठा खर्च येतो. अनेकदा आंब्यापेक्षा वाहतुकीचाच खर्च अधिक होत असल्याने आंब्याचे दरही वाढतात. परिणामी ग्राहक इतर देशातील आंब्यांकडे वळू शकतात. 

तुलनेत जलवाहतुकीचा खर्च कमी असतो. आंब्याचे दरही मर्यादित राहू शकतात. त्यामुळे भारतीय आंब्याचा ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी हवाई वाहतुकीसोबतच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मॉक्सलाइन शिपिंग कंपनीच्या मुंबई ते इंग्लंड जल वाहतूक सेवेच्या माध्यमातून आंब्याचा हा पहिला कंटेनर इंग्लंडला येत्या दोन दिवसांत रवाना होणार आहे. पुढील २१ दिवसांत हे जहाज इंग्लंडला पोचेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com