कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच हवे नियोजन

आंबा हंगामाची कामे ऑक्टोबर - नोव्हेंबरपासून सुरू होतात. ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत बागेची साफसफाई पूर्ण केल्यानंतरआंबा झाडांच्या फांद्यांची विरळणी करून घ्यावी. यामुळे झाडामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडून हवाही खेळती राहील.
Jassids infestation on mango
Jassids infestation on mango

कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर येणाऱ्या किडी व रोगांसाठी अतिशय अनुकूल आहे. अशा स्थितीमध्ये कोकणाचे म्हणजेच आंब्याचे अर्थकारण सर्वस्वी आंबा बागेतील किडी व रोगांच्या व्यवस्थापनावर निगडित असते. आंबा हंगामाची कामे ऑक्टोबर - नोव्हेंबरपासून सुरू होतात. या कामामध्ये पीक संरक्षणाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत बागेची साफसफाई पूर्ण केल्यानंतर आंबा झाडांच्या फांद्यांची विरळणी करून घ्यावी. यामुळे झाडामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडून हवाही खेळती राहील. या वर्षीचा लांबलेल्या पावसामुळे बऱ्याच बागांमध्ये पालवी उशिरा आढळून येत आहे. अशा परिस्थितीत या पालवलेल्या बागांमध्ये मोहोरसुद्धा उशिरा म्हणजे साधारणपणे जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या बागांमध्ये पॅक्लोब्युट्रॉझॉलचा वापर केलेला आहे, अशा बागांमध्ये थंडीचे वातावरण चांगले राहिल्यास मोहोर लवकर येण्याची शक्यता आहे. बागेतील परिस्थितीनुसार आंबा पीक संरक्षणाचा विचार करावा. 

  • पहिली फवारणी ः विरळणीनंतर आंबा बागांवर प्रामुख्याने डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी करावी.   पावसानंतर आलेल्या कोवळ्या पालवीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झालेला असतो. बऱ्याच वेळेला तुडतुडे आंब्याच्या पालवीवर सुप्तावस्थेत असतात.  नंतर मोहोर आल्यावर वातावरण पोषक असल्यास त्याचा उद्रेक होण्याची शक्यता असते. या फवारणीमुळे तुडतुड्यांचे नियंत्रण होते. 
  • अलीकडच्या काळामध्ये सतत बदलत्या वातावरणामुळे आंबा बागांमध्ये अवेळी पालवी येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण व पाऊस येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता वरील फवारणीमध्ये कार्बेन्डाझीम अधिक मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे समावेश करावा. करपा रोगाचे नियंत्रण करता  येईल. 
  • दुसरी फवारणी ः बोंगे फुटण्याच्या अवस्थेत बोंगे पोखरणारी अळी, मिजमाशी इ. किडींचा प्रादुर्भाव होतो. मात्र, आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ०.६ मि.लि. 
  • तिसरी फवारणी ः दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी मोहोर पोखरणारी अळी, तुडतुडे, मिजमाशी व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी तर चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी आंबा कलमांवर फुलकिडीचा प्रादुर्भाव असल्यासच करावी. त्यासोबत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी  हेक्झाकोनॅझॉल (५ टक्के) ०.५ मि.लि. अथवा पाण्यात मिसळणारे गंधक (८० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. - मोहोराच्या अवस्थेत ढगाळ वातावरण असल्यास अथवा पाऊस पडल्यास मोहोरावर तसेच छोट्या फळांवर करपा रोग येण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
  • फळ काढणीयोग्य अवस्थेमध्ये फळ पोखरणारी अळी आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावेळी गरज असल्यास पाचवी फवारणी करावी. फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी फळ पक्व होण्याअगोदर बागेमध्ये प्रति हेक्टरी चार रक्षक सापळे लावावेत.
  • आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित वेळापत्रक  

    फवारणीचा कालावधी  कीटकनाशक  (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)    शेरा
    पहिली फवारणी ः पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी   डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही)    ९ मि.लि  या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते. 
    दुसरी फवारणी ः (बोंगे फुटताना)   लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही)    ६ मि.लि. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मि.लि. किंवा पाण्यात  विरघळणारे  ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
    तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणी नंतर १५ दिवसांच्या अंतराने)  इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही)    ३ मि.लि.  तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या   नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर  पाण्यात विरघळणारे  ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारावे.
    चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर नंतर १५ दिवसांच्या अंतराने)  थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी)    १ ग्रॅम   
    पाचवी फवारणी (चौथ्या फवारणी नंतर १५ दिवसांच्या अंतराने)  डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही)     १० मि.लि.  ६ मि.लि. 
    सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने)  पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची  फवारणी करावी.  तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.

    संपर्कः डॉ. बी. डी. शिंदे (सहाय्यक प्राध्यापक ), ८८०६३४०८५५ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com