मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित

औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान केले. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटका बसला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची सारी भिस्त तुरीच्या पिकावरच अवलंबून आहे.
 In Marathwada, the economic mathematics of the farmers is on the trumpet
In Marathwada, the economic mathematics of the farmers is on the trumpet

औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान केले. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटका बसला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची सारी भिस्त तुरीच्या पिकावरच अवलंबून आहे. ढगाळ वातावरणाचे तुरीवरील संकट पाहता या पिकातून पदरात काय पडते, त्याला बाजारात दर काय मिळतो? यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असणार आहे.  

कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार मराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९७ हजार ६०० हेक्‍टर होते. त्या  तुलनेत प्रत्यक्षात ४ लाख ७० हजार ४७० हेक्‍टर २५ गुंठ्यावर तुरीचे पेरणी झाली. जालना, बीड व नांदेड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे, तर हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद आदी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७५ ते ९४ टक्‍के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. 

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्हे तुरीचे आगर मानले जातात. यंदा प्रत्यक्ष तुरीची पेरणी झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ३० हजार २८८ हेक्‍टर, जालना ५० हजार ३३४ हेक्‍टर, बीड ६१ हजार ३०८ हेक्‍टर, लातूर ८८ हजार ९२० हेक्‍टर, उस्मानाबाद ७६ हजार ६४३ हेक्‍टर, परभणी ४६ हजार २७४ हेक्‍टर, हिंगोली ४४ हजार ६३९ हेक्‍टर, तर नांदेड जिल्ह्यातील ७२ हजार ६३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदासाठी शासनाने तुरीसाठी ६ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर जाहीर केला आहे. २०१६-१७ मध्ये हा दर ५०५० रुपये प्रतिक्‍विंटल होता. 

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार अंतिम क्षेत्र व प्रत्यक्ष क्षेत्र याचा गोंधळ होता कामा नये. खरेदीसाठीच्या उत्पादकतेचे गणित सुधारित वाणाच्या प्रत्यक्ष उत्पादकतेचा विचार करून बसवावे. खरेदी केंद्राची संख्या निश्‍चित करावी. तुरीचे चांगले उत्पादन येण्याची आशा आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर तूर हमी दरापेक्षा कमी दराने विकण्याची वेळ येवू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सोयाबीन, मूग, उडदासह कापूसही गेल्यात जमा आहे. तुरीच्या पिकांकडून मोठी आशा आहे. त्यावरही कीड रोगांचं संकट आहेच. हमी दरापेक्षा कमी दराने तूर विकण्याची वेळ येवू नये. त्यासाठी शासनाने नियोजन करावं. - संजय मोरे, शेतकरी नळविहिरा, ता. जाफराबाद, जि. जालना. 

सुधारित वाणांचा वापर होते. त्यामुळे एकरी उत्पादकता त्यानुसार धरली जावी. त्यानुसार खरेदीचं नियोजन करावं.  अन्यथा, शेतकऱ्यांची अडचण होईल.  - संदीप लोंढे, शेतकरी, शेवगळ,  ता. घनसावंगी जि. जालना. 

खरेदीतील किचकट पद्धतीला शेतकऱ्यांना  सामोरे जावे लागू नये. चांगल्या उत्पादनाची आशा आहे. निदान यंदा तरी खरेदीच्या प्रक्रियेत अडचणी येवू नये. - बळिराम होटकर, शेतकरी, विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com