मराठवाड्यात ऑक्‍टोबरअखेर ६४ टक्‍क्‍यांवर उपयुक्‍त पाणी
मराठवाड्यात ऑक्‍टोबरअखेर ६४ टक्‍क्‍यांवर उपयुक्‍त पाणी

मराठवाड्यात ऑक्‍टोबरअखेर ६४ टक्‍क्‍यांवर उपयुक्‍त पाणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑक्‍टोबरअखेर ६३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७२ टक्‍क्‍यांवर आहे. तरीही ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणी ४७ ठक्‍के, लघू प्रकल्पांत ४१ टक्‍केच आहे. दुसरीकडे गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ८५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत ७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जलसंपदा विभागाच्या १ नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार, ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, निम्न मनार, विष्‍‌णुपुरी हे तीन्ही प्रकल्प तुडुंब आहेत. दुसरीकडे येलदरीत ६०, टक्‍के, माजलगावमध्ये ७१ टक्‍के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ५९ टक्‍के, निम्न तेरणामध्ये ३२ टक्‍के, तर निम्न दुधनामध्ये ८ टक्‍केच उपयुक्‍त पाणी होते. सिद्धेश्‍वर, मांजरा व सीना-कोळेगाव प्रकल्पांना उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षाच होती. ७५ मध्यम प्रकल्पांची व लघू प्रकल्पांची स्थिती ऑक्‍टोबरअखेरपर्यंतच्या आणि आताच्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ३६ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत ३४ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत २३ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४१ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत सर्वाधिक ९९ टक्‍के, तर परभणीमधील २ मध्यम प्रकल्पांत ७१ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघू प्रकल्पांची स्थितीही बऱ्यापैकी सुधारली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ४४ टक्‍के, जालनामधील ५७ प्रकल्पांत १६ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३६ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ४७ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ३० टक्‍के, नांदेडमधील २२ प्रकल्पांत ७७ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ४० टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ८५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील स्थितीही चांगली आहे. 

मध्यम, लघू प्रकल्पांची स्थिती बिकट

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६ मध्यम व ६७ लघू प्रकल्पांत ऑक्‍टोबरअखेरपर्यंत पाण्याचा थेंबही साठला नव्हता. औरंगाबाद जिल्ह्यातील १ व बीडमधील ५ मिळून सहा मध्यम प्रकल्पांच्या घशाला कोरडच होती. दुसरीकडे ६७ लघू प्रकल्पांत पाणीच साठले नव्हते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २१, जालनामधील २, बीडमधील २७, लातूरमधील ९, उस्मानाबादमधील ८ प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com