बोंड अळी नियंत्रणासाठी ‘मास ट्रॅपिंग'चा प्रयोग

गुजरात कृषी विद्यापीठाच्या धर्तीवरती १६ ट्रॅप प्रतिएकर लावून जास्तीत जास्त नर पतंग पकडण्याची प्रत्यक्ष शेतावरील चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे. या चाचणीमधून नुकसान, उत्पादन खर्च असा प्रयोग नसलेल्या ठिकाणाशी त्याचा तुलनात्मक अभ्यास करून शिफारस दिली जाणार आहे. - अजय मिटकरी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जि. जालना.
जालना : जिल्ह्यातील कडेगाव येथील दहा शेतकऱ्यांच्या सलग दहा एकरांत अशाप्रकारे प्रतिएकर सोळाप्रमाणे १६० ट्रॅप लावण्यात आले आहेत.
जालना : जिल्ह्यातील कडेगाव येथील दहा शेतकऱ्यांच्या सलग दहा एकरांत अशाप्रकारे प्रतिएकर सोळाप्रमाणे १६० ट्रॅप लावण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक गत हंगामात शेतकरी, कृषीची यंत्रणा व तज्‍ज्ञांनी अनुभवला. यंदाही लवकर लागवड झालेल्या कपाशी पिकात गुलाबी बोंड काही भागांत डोके वर काढते आहे. अशावेळी कामगंध सापळ्यांच्या आधारे मराठवाड्यात चार ठिकाणी ‘मास ट्रॅपिंग’चा प्रयोग राबविला जाणार आहे. जालना जिल्ह्यातील कडेगाव येथे गुजरातच्या धर्तीवर 'मास ट्रॅपिंग'साठी दहा शेतकऱ्यांच्या दहा एकरांवर प्रतिएकर सोळा कामगंध सापळे लावण्यात आले आहेत.   यंदा मराठवाड्यात हंगामपूर्व कपाशीची लागवड झाली नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे कामही मोहीम म्हणून हाती घेतले जात आहे. अशावेळी प्रयोग म्हणून गुजरातच्या धर्तीवर राबविल्या जात असलेल्या 'मास ट्रॅपिंग'नेही आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. जालना जिल्ह्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कडेगाव येथील दहा शेतकऱ्यांच्या सलग दहा एकरांवर हा प्रयोग राबविला जात आहे. त्या क्षेत्रातील गुलाबी बोंड अळीचे जास्तीत जास्त नर पतंग ट्रॅप करायचे व त्यामाध्यमातून गुलाबी बोंड अळीची पुढील पिढी निर्माण होण्यावर नियंत्रण आणण्याचे काम या प्रयोगातून केले जाणार आहे. गुजरातमधील कृषी विद्यापीठाने याविषयी संशोधन करून २०१६ च्या जॉईंट ॲग्रोस्कोमध्ये एकरी १६ कामगंध सापळे लावण्याविषयी शिफारस केली होते. याविषयी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राकडून 'मास ट्रॅपिंग' प्रयोग शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाला परवडणार आहे का याची चाचपणी झाली. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या यंदाच्या ॲक्‍शन प्लॅन विषयीच्या बैठकीत परवानगी मिळण्याची मागणी करण्यात आली. त्याला मंजुरात मिळाल्यानंतर 'मास ट्रॅपिंग' राबविण्यासाठी कडेगावातील दहा शेतकऱ्यांच्या दहा एकरांवर दहा दिवसांपूर्वीच एकूण १६० ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रामार्फत तसेच अंबाजोगाई येथील डिघोळअंबा कृषी विज्ञान केंद्र व औरंगाबादच्या एमजीएम कृषी विज्ञान केंद्रामार्फतही प्रत्येकी एका गावात ‘मास ट्रॅपिंग’चा प्रयोग केला जाणार आहे.  असे होतील फायदे...

  • हे यशस्वी झाल्यास नुकसानीच्या पातळीआधीच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण येईल.
  •  कीटकनाशकाचा खर्च कमी करण्यात यश मिळेल.     रासायनिक किडनाशकाचा मित्र किडी, प्राणी, माणसांवरीत होणार दुष्परिणाम रोखता येईल.     
  • शाश्‍वत उत्पादन मिळविण्यातही मिळेल यश.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com