कृषी विद्यापीठे भरती मंडळाची पीएचडी मुद्द्यावर कोलांटउडी

कृषी विद्यापीठे भरती मंडळाची पीएचडी मुद्द्यावर कोलांटउडी
कृषी विद्यापीठे भरती मंडळाची पीएचडी मुद्द्यावर कोलांटउडी

पुणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी वैध नसल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाने कोलांटउडी घेतली आहे. मंडळाने आधीचे घेतलेले वादग्रस्त निर्णय रद्द करून पीएचडीची समकक्षता मान्य केली आहे.   महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कक्षेत काम करणाऱ्या मंडळाने यापूर्वी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे काही विद्यापीठांमधील अधिष्ठातापदाच्या नेमणुका रद्द कराव्या लागल्या होत्या. मंडळाच्या अध्यक्षांचा संदर्भ देऊन विद्यापीठांनी या नियुक्त्या रद्द केल्या. मात्र आम्हाला यातले काहीच माहिती नाही, अशी संशयास्पद भूमिका मंडळाने घेतली होती.   “मंडळाचे कामकाज पीएचडी मुद्दावर वादग्रस्त ठरले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये पदोन्नत्या देताना मुक्त विद्यापीठाची पीएचडी चालणार नाही अशी उरफाटी भूमिका मंडळाने घेतली. विद्यापीठ अनुदान मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेपर्यंत देशभर या पीएचडीला मान्यता होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन आपली भूमिका बदलली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  मुक्त विद्यापीठाच्या पीएचडीबाबत आधी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणतीही हरकत घेतलेली नव्हती. त्यामुळे या पीएचडीला इतर विद्यापीठाशी समकक्ष मानावे, अशी मागणी काही प्राध्यापकांची होती. मंडळाने मात्र समकक्षतेला नकार दिला. त्यामुळेच प्रकरण उच्च न्यायालयात गेले. विशेष म्हणजे मंडळाने न्यायालयात देखील नकारघंटा वाजविली होती. मुक्त विद्यापीठांच्या पदवीला मान्य करणारे निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मंडळाची भूमिका विसंगत असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात मांडला गेला. न्यायालयाने ही विसंगती मान्य केली. “या विसंगतीवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. विसंगती दूर न केल्यास दोन लाखांचा दंड करण्याचा इशारा न्यायालयाने दिला. त्यामुळे मंडळाने घाईघाईने बैठक घेतली आणि पीएचडीचा मुद्दा मान्य केला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  माजी कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या या बैठकीला प्रा. एम. सी. वारष्णेय, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. अशोक ढवण, डॉ. एस. डी. सावंत तसेच कृषी परिषदेचे महासंचालक महेंद्र वारभूवन उपस्थित होते. मात्र, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी व डॉ. जी. व्यंकटेश्वरलू अनुपस्थित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  दरम्यान, न्यायालयाने मंडळाचे निर्णय व त्याबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पीएचडी वादाच्या याचिका निकाली काढल्या आहेत. त्यामुळे मंडळाला दिलासा मिळाला आहे.  फक्त विद्यापीठ कायद्यातील विषयाला मान्यता मुक्त विद्यापीठाच्या पीएचडीला मान्यता असली, तरी संबंधित पीएचडीचा विषय कृषी विद्यापीठे कायद्याच्या परिनियमातील यादीतील हवा. यादीबाहेरील पीएचडीचा विषय मान्य करता येणार नाही, असादेखील निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठे भरती मंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com