गारपीटीनंतर बागेतील उपाययोजना

द्राक्षबागेत वेलीच्या कालपर्यंत व्यवस्थितरीत्या सर्व घडामोडी सुरू होत्या. परंतू, सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, कर्नाटकातील विजापूर, जमखंडी भागात वादळी वारे सुरू होऊन जवळपास एक तासभर गारपीट झाली. यामुळे सुरळीत असलेली वेलीच्या वाढीत अचानक बदल घडले, बऱ्याच बागेमध्ये नुकसान झाले. अशा स्थितीमध्ये अधिक नुकसान टाळण्यासाठी पुढील उपाययोजना उपयोगी ठरतील.
grapes advisory
grapes advisory

द्राक्षबागेत वेलीच्या कालपर्यंत व्यवस्थितरीत्या सर्व घडामोडी सुरू होत्या. परंतू, सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, कर्नाटकातील विजापूर, जमखंडी भागात वादळी वारे सुरू होऊन जवळपास एक तासभर गारपीट झाली. यामुळे सुरळीत असलेली वेलीच्या वाढीत अचानक बदल घडले, बऱ्याच बागेमध्ये नुकसान झाले. अशा स्थितीमध्ये अधिक नुकसान टाळण्यासाठी पुढील उपाययोजना उपयोगी ठरतील.   खरडछाटणी घेतलेली बाग

  • काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे फक्त पाने चिरली, तर काही ठिकाणी नवीन वाढत असलेल्या काडीवर जखम झाली. ज्या ठिकाणी गाराची तीव्रता जास्त होती, अशा बागेत वाढत असलेली काडी अर्ध्यातून किंवा तळातून मोडली. खरडछाटणी होऊन चार पाच पानाच्या अवस्थेत जर नुकसान झालेले असल्यास तळातून दोन ते तीन पाने सोडून पुन्हा या कोवळ्या फुटीवर रिकट घ्यावा. असे केल्यास वेळ वाया जाणार नाही. वाढही झपाट्याने होईल.
  • सबकेन झालेल्या बागेत कॅनोपी तयार झालेली असल्यामुळे जखम काडीवर कमी प्रमाणात दिसेल. मात्र, वरील भागात पाने फाटलेली दिसतील, काडीही चिरलेली दिसेल. अशा परिस्थितीत सबकेननंतरची फूट पिंचिंग करून पुढे वाढ करून घेता येईल. कमी जखम झालेल्या काडीवर पुन्हा रिकट घेऊन वाढ करून घेण्याची गरज नाही. किरकोळ असलेली जखम शक्य तितक्या लवकर भरून जाते.
  • ज्या ठिकाणी काडीवर जखम जास्त प्रमाणात दिसते. त्या जखमेच्या एक डोळा खाली पुन्हा रिकट घ्यावा व पुन्हा वाढ करून घ्यावी. ज्या ठिकाणी काडी मोडली असल्यास मोडलेल्या जागेपासून एक डोळा खाली रिकट घेणे गरजेचे असेल. ज्या ठिकाणी किरकोळ जखम झालेली आहे, तिथेही शेंड्यावर दोन डोळे खुडून घ्यावेत.
  • बागेत झालेल्या जास्त पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण वाढले असेल. पाऊस संपल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल व त्या सोबत पुढील आठ दिवस आर्द्रताही तितकीच जास्त वाढेल व टिकून राहिल. अशा परिस्थितीत नवीन फुटीची वाढ जोमात होण्यास मदत होईल. ज्या काडीवरील पाने चिरलेली आहे, अशा काडीवर प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये गोळा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतील. अशा काडीवर फाटलेल्या पानांची परिस्थिती पाहून शेंड्याकडील काही पाने वाढवून घ्यावीत.
  • रिकटनंतरची बाग वर दिल्याप्रमाणे या बागेतही अडचणी आढळून येतील. ज्या बागेत ओलांड्यावर गारांचा मार बसला व जखम झाली. अशा बागेत ओलांड्याचा रिकट घ्यावा का, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उद्भवते. अशा वेळी पावसामुळे जमिनीत मुळांच्या कक्षेत पाणी जास्त झाल्याने नवीन मुळेही झपाट्याने तयार होतील. त्यामुळे खाडापासून ओलांड्यापर्यंत रसनिर्मिती जास्त प्रमाणात होईल. असे झाल्यास ओलांड्यावर झालेली जखम भरून येण्यास मदत होईल. तेव्हा ओलांड्याचा रिकट न घेता अन्नद्रव्याचा वापर करून वाढ सरळ करून घ्यावी. या वाढत्या आर्द्रतेमुळे वाढीचा जोम जास्त राहिल. तेव्हा घडनिर्मितीस बाधा येऊ नये म्हणून ६ बीए १० पीपीएम व युरासील २५ पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. त्यासोबत वाढीचा जोम नियंत्रणात ठेवण्याकरिता ०-५२-३४ या खताची दीड ते दोन ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे एक ते दोन फवारण्या घ्याव्यात. खत व्यवस्थापन  कालपर्यंत वाढलेल्या फुटींकरिता वापरलेली अन्नद्रव्ये वाया गेल्यासारखीच आहेत. आता पुन्हा वाढ करून फळधारीत काड्या तयार करण्यासाठी वाढ होणे गरजेचे आहे. या करिता जमिनीतून नत्र आणि स्फुरदाची उपलब्धता आवश्यक असेल. छाटणीनंतर निघालेल्या चार पाच पाने अवस्थेतील बागेत युरीया एक ते सव्वा किलो प्रती एकर प्रती दिवस या प्रमाणे तीन ते चार वेळा द्यावे. सबकेन झालेल्या बागेत युरीया फक्त एकदाच द्यावा. तसेच युरीया दीड ते दोन ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे फक्त एकदा फवारणी करावी. या बागेत एक दोन दिवसानंतर पानांच्या वाट्या होताना दिसून येतील. सोर्स सिंक गुणोत्तर ( वेलीची गरज व पुरवठा यातील ताळमेळ) अचानक बिघडल्यामुळे ही परिस्थिती तयार होते. अशा वेळी ०-०-५० या खताची दोन ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे एक फवारणी घ्यावी. तसेच ०-०-५० हे खत दोन ते अडीच किलो प्रती एकर या प्रमाणे ड्रिपद्वारे द्यावे. रोग व्यवस्थापन

  • या वाढत्या तापमानात अशा बागेत रोग येण्याची शक्यता कमीत कमी असेल. बरेच बागायतदार पाऊस येताच डाऊनी मिल्ड्यू, अॅन्थ्रक्नोज च्या नियंत्रणाकरिता फवारणी सुरू करतात. या परिस्थितीत या फवारण्या शक्यतो टाळाव्यात. गारपीट व वादळी पावसामुळे पाने चिरली, काडीवर भेगा पडल्या किंवा काडी मोडली आहे, अशा जखमा झालेल्या स्थितीत बुरशी व सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी त्यावर नियंत्रण आणण्याकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे एक फवारणी पुरेशी राहिल.  
  • वाळवा भागात मागील हंगामात जास्त प्रमाणात पाऊस होऊन इथे डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त काळ टिकून राहिला. कालच्या या पावसामुळे या रोगाचे बिजाणू पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. या भागात पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड ४ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम या सोबत सिलीकॉन युक्त अॅडज्युएंट १ मि.लि. मिसळून प्रती लीटर पाणी प्रमाणे त्वरीत फवारणी घ्यावी.
  • संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com