ई - नामला पुणे बाजारसमितीतील अडत्यांचा विरोध

पुणे बाजार समितीमधील भुसार विभागात गूळ या एकमेव शेतीमालाची आवक होते. त्यामुळे गूळ या शेतीमालाची ई-नाम पोर्टलवर निवड करण्यात आली. मात्र, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन अडते करीत नाहीत. त्यामुळे त्यांना परवाना निलंबन का करू नये, याबाबत नोटिसा दिल्या आहेत. -बी. जे. देशमुख , प्रशासक, पुणे बाजार समिती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : केंद्र सरकारच्या आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई - नाम) योजनेला पुणे बाजार समितीमधील गुळाच्या अडत्यांनी नकारात्मक मानसिकतेतून विविध कारणे देत विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लिलावच बंद ठेवत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला असून, बाजार समिती प्रशासनाने अडत्यांना परवाने निलंबनाच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा अडते आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून पुणे बाजार समितीमध्ये गूळ विभागातील लिलाव आॅनलाइन करण्याचे प्रयत्न पणन मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सुरू आहेत. यासाठी अडत्यांना प्रशिक्षण देण्यासह सातत्याने बैठका घेण्यात आल्या. या वेळी त्यांच्या शंका आणि अडचणींचे निरसन करण्यात आल्याचे पणन मंडळ आणि बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

मात्र, या योजनेची अंमलबजावणी करण्यात तांत्रिक अडचणी असून, त्याची पूर्वकल्पना देऊनदेखील त्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे बाजार आवारातील गुळाचे लिलाव बंद पडले असून, योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत. त्या अडचणींची पूर्ण कल्पना बाजार समिती; तसेच योजनेचे नोडल अधिकारी यांच्या लक्षात वारंवार आणून दिली. मात्र, त्यामध्ये कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. ई-लिलावामुळे प्रत्यक्ष मालाचा दर्जा कळत नसल्याने आम्ही थेट गुऱ्हाळावरुन गूळ खरेदी सुरू केली आहे, असे पुणे जाॅँगरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेठिया यांनी सांगितले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमालाचे सर्व पैसे ई-नाम पोर्टलच्या माध्यमातून द्यायचे आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना गरजेची सामग्री घेण्यासाठी अडत्यांकडून पैसे उपलब्ध करून दिले जात होते. ते आता बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट गुळाची विक्री सुरू केली आहे. परिणामी, बाजार आवारात माल येत नसल्याने गुळाचे सर्व लिलाव बंद पडले आहेत, असेही सेठिया यांनी सांगितले.

दरम्यान, ई-नामची प्रभावी अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येत असल्याचे कारण पुढे करीत बाजार समितीने पाच अडत्यांना परवाना निलंबन का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस दिली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com