काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी  मुख्यमंत्री प्रयत्नशील ः अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नाही. लोकसभेला यश मिळाले म्हणून भाजपनेही हुरळून जाण्याचे कारण नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभेचे विषय वेगळे असतात. त्यामुळे निकालही वेगळे असू शकतात हे याआधी सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना फोन करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केला. भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे जुने सहकारीसुद्धा आमच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी चालवली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा केला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर, भारत भालके यांच्या नावांची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करीत आहेत. अनेक आमदारांना ते फोन करत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल असे वाटत नाही. काँग्रेसचे आमदार भाजपच्या दिशेने जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांनी टिळक भवनमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. चव्हाण यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्याची माहिती दिली. नांदेड जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचार केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा झाली. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यास हरकत नाही, असा सूर लावला. आंबेडकर यांना सोबत घेऊन जाण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे यासंदर्भात आता त्यांनीच निर्णय घ्यावा, असे चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com