हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत जाणार

खासदार राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी

बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या दोन मागण्या महाआघाडीने किमान समान कार्यक्रमात घेतल्या नाही, तर महाआघाडीत सहभागी होण्यास आपल्याला स्वारस्य नाही. वेळप्रसंगी आपण स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवू असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ, मराठवाड्याच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केला. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला, मात्र हा दुष्काळ सुसह्य करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना अद्याप केलेल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी प्रश्नावर सरकारला धडा शिकविण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या १७ ते २५ डिसेंबरपर्यंत दोन टप्प्यात आक्रमक आंदोलन करण्याची घोषणाही खासदार शेट्टी यांनी या वेळी केली.

बुलडाणा अर्बन रेसिडेन्‍सीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विदर्भ, मराठवाड्याच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी (ता. ९) पार पडली. बैठकीला ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रांताध्यक्ष प्रकाश पोफळे, हंसराज वडघुले, सुबोध मोहिते आदी उपस्थित होते.

कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी म्हणाले, की देशपातळीवर भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांची महाआघाडी होऊ घातली आहे. त्यामध्ये आम्हालाही निमंत्रित करण्यात आले. मात्र आमचे ध्येय हे कोणाला पाडून निवडून येणे किंवा सत्तेत जाऊन बसणे हे नाही. आमच्यासमोर केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचे हित आहे. त्यासाठी महाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात आमच्या अटी मान्य असतील तरच आम्ही जागा वाटपाची पुढील बोलणी करू. लोकसभेच्या हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, धुळे, लातूर, वर्धा, बुलडाण्यासह सात ते आठ जागांसाठी आमचा आग्रह राहणार आहे. यामध्ये बुलडाणा आणि वर्धा या आमच्या प्रतिष्ठेच्या जागा असतील. त्यातील बुलडाण्याची जागा ही रविकांत तुपकर हे लढविणार असल्याचेही श्री. शेट्टी यांनी जाहीर केले. 

सरकारने दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना शून्य आहेत. शेतीसाठीचे वीज कनेक्शन तोडणे सुरूच आहे, शेतकऱ्यांकडून वसुली सुरूच आहे, कर्ज पुनर्गठणाची अंमलबजावणी नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जनावरांना चारा छावण्यावर नको तर तो दावणीवर द्या या मागणीवरही सरकार बोलत नाही. त्यामुळे दुष्काळी प्रश्नावर निष्क्रीय असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १७ ते २५ डिसेंबर या काळात ‘स्वाभिमानी’ विदर्भ, मराठवाड्यात आक्रमक आंदोलन करेल. यातील पहिल्या टप्प्यात सोमवारी (ता. १७) प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना घेराव घालण्यात येईल. त्यानंतरही जर सरकारने उपाय योजना केल्या नाही, तर मंगळवारी (ता. २५) प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत, असे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com