जतमधील लाभक्षेत्राला ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेना

मुळात ज्या वेळी पाणी हवे असते, त्या वेळी पाणी मिळत नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावर शेती करणे कठीण आहे. त्यामुळे प्राधान्याने आमच्या तालुक्‍याला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घ्यावा. - संभाजी रामचंद्र कोडग, आवंढी, जि. सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यांचा समावेश आहे. या योजनेत जत तालुक्‍यातील ७६ गावे आणि २२ हजार २५० हेक्‍टर लाभक्षेत्र आहे. मात्र, गेली तीन ते चार वर्षांपासून या तालुक्‍यातील गावांना पुरेशा दाबाने पाणीच मिळत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात जतला १५० क्‍युसेकने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. मात्र, योजनेच्या लाभक्षेत्रात असून देखील पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.
 
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागातील शेती बागायती झाली आहे. जत तालुक्‍यातील ७६ गावे आणि २२ हजार २५० हेक्‍टर क्षेत्राला या योजनेचा फायदा होत आहे. वास्तविक पाहता जत तालुक्‍यात मुख्य कालव्यानेच पाणी पोचते. त्यामुळे तालुक्‍यातील मुख्य कालव्यालगत असणारी शेती फुलली आहे. काहीशा प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली आहे. मात्र, या योजनेचे पाणी जत तालुक्‍याला मिळतच नाही. त्यामुळे दरवर्षी आमच्या तालुक्‍याला अगोदर पाणी द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांची असल्याचे पाहावयास मिळते आहे.
 
वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर शेती करणे मुश्‍कील झाले आहे. परंतु मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्‍यातील लाभ क्षेत्राला प्राधान्याने पाणी दिले जाते. या तालुक्‍यांतील शेतकरी पाणी मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतात. यामुळे जत तालुक्‍याला पाणी कमी दाबाने मिळते. पण या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कधीच वेळेत पाणी मिळत नाही. याचे कारण म्हणजे यामध्ये सातत्याने येणारे राजकारण.
 
मुळात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाल्यानंतर प्राधान्याने जत तालुक्‍यातील लाभक्षेत्राला पाणी देण्याचा नियम आहे, असे पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, तसे होताना दिसत नाही. 
गेल्या आठवड्यात सांगली येथील पाटबंधारे विभागात जत तालुक्‍याला पाणी देण्याबाबत बैठक झाली.
 
यामध्ये मुख्य कालव्यावरील थेट पाणी उपसा करण्यासाठी बंदी घातली. त्याचबरोबर जत तालुक्‍यात ३०० क्‍युसेकने पाणी द्यावे, अशी देखील मागणी केली. मात्र, पाटबंधारे विभागाने १५० क्‍युसेकने पाणीपुरवठा केला जाईल असे ठामपणे सांगितले आहे. मात्र, १५० क्‍युसेकने पाणीपुरवठा केल्यास तालुक्‍यातील लाभक्षेत्राला पाणी कसे उपलब्ध होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
 
त्याचप्रमाणे जत तालुक्‍यातील या योजनेची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे लाभक्षेत्राला पाणीच मिळत नाही, तसेच मुळात योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच जत तालुक्‍याला पाणी देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, तरच जत तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com