माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल, तर लागणीच्या वेळी प्रति हेक्टर फेरस सल्फेट २५ किलो, झिंक सल्फेट २० किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स किंवा बोरिक ॲसिड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे. ऊस पिकासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेतच. त्यासोबत लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व आहे. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल, तर लागणीच्या वेळी प्रति हेक्टर फेरस सल्फेट २५ किलो, झिंक सल्फेट २० किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स किंवा बोरिक ॲसिड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे. द्रवरूप खताची फवारणी व्हीएसआय निर्मित मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खतांची एकत्रित फवारणी करावी. पहिली फवारणी २०० लिटर पाण्यात प्रत्येकी २ लिटर (मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट) या प्रमाणात लागणीनंतर ६० दिवसांनी करावी. दुसरी फवारणी ३०० लिटर पाण्यात प्रत्येकी ३ लिटर या प्रमाणात ९० दिवसांनी केल्यास उत्पादनात वाढ होते. द्रवरूप खतांची फवारणी
सर्वसाधारणपणे सुरू हंगामामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे जमिनीत ओलावा कमी होतो. ओलावा कमी असल्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते आणि मुळांची वाढ मंदावते. अशावेळी द्रवरूप खतांची फवारणी केल्यास ऊस पिकावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. द्रवरूप खतांमध्ये पोषकद्रवे ही विद्राव्य स्थितीत असल्यामुळे वनस्पतीला त्यांची उपलब्धता त्वरित होते. याचा पिकांच्या वाढीवर लवकर परिणाम दिसून येतो. साधारण एक महिन्याच्या अंतराने २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची उसाच्या पानांवर फवारणी करावी. म्युरेट ऑफ पोटॅशच्या फवारणीमुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. तसेच पानांद्वारे होणारे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात पाचटाचे आच्छादन करावे किंवा उभ्या उसातील पिवळी किंवा वाळलेली पाने काढून आच्छादन करावे. पाचट हा जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. पाचट आच्छादनामुळे जमिनीचे तापमान योग्य राखले जाते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. तणांची वाढ होत नाही, पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. ऊस पिकात पाणी तुडुंब भरू नये, त्यामुळे फुटवा कमी येतो. सुरुवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांनी आणि पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सुरुवातीच्या सर्व सऱ्यांना पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यानंतर रिकाम्या सरीत पाणी द्यावे. पाचट आच्छादन केलेल्या सरीत पाणी देण्याची गरज नाही. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे. व्हीएसआय निर्मित सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरूप विद्राव्य खते
उस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी संशोधनावर आधारीत व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरूप खत तयार केले आहे. व्हीएसआय मायक्रोसोल मध्ये लोह (२ %),मँगनीज (१ %), जस्त (५ %), तांबे (०.५%) आणि बोरॉन (१ %) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. व्हीएसआय मायक्रोसोल वापरामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य, प्रथिने, संप्रेरके र्निर्मितीमध्ये वाढ होते. पेशींची वाढ होऊन पेशी विभाजनात याचा सक्रिय सहभाग दिसून येतो. परिणामी, ऊस उत्पादन आणि साखर उतारत वाढ होते. व्हीएसआय मायक्रोसोल एकरी १० किलो मात्रा द्यावी. ही विद्राव्य खते सेंद्रिय आम्लयुक्त असल्यामुळे पाण्यात पूर्णपणे विरघळतात. त्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहेत. ठिबक संचाद्वारे एकरी २.५ किलो १०० लिटर पाण्यात विरघळून लागणीच्या वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. ठिबक संच उपलब्ध नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून रासानिक खताच्या मात्रेसोबत लागणीचे वेळी एकरी ५ किलो द्यावे. आणि ऊस बांधणीच्या वेळी ५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे. संपर्क ः डॉ. पी.एस.देशमुख, ९९२१५४६८३१ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे)