जळगाव जिल्ह्यात दूध व्यवसाय, रब्बी संकटात

जळगाव जिल्ह्यात दूध व्यवसाय, रब्बी संकटात
जळगाव जिल्ह्यात दूध व्यवसाय, रब्बी संकटात

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम दुष्काळीस्थितीमुळे वाया गेला. रब्बीही जेमतेम स्थितीत आहे. फक्त ५५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चारा, पशुखाद्य परवडत नसल्याने शेतीला पूरक असलेला दूध व्यवसाय अडचणीत आहे.

खरिपात सात लाख ६५ हजार हेक्‍टरऐवजी ९५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली. सर्वाधिक चार लाख ५० हजार हेक्‍टवर कापसाची लागवड झाली. यात सुमारे ८० हजार हेक्‍टर क्षेत्र पूर्वहंगामी (बागायती) कापसाचे होते. उर्वरित सुमारे तीन लाख हेक्‍टरवर तृणधान्ये, कडधान्ये व गळीतधान्याची पेरणी झाली. जूनमधील पावसामुळे पेरणीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली. पण जूनमध्ये १६, जुलैमध्ये १८ आणि ऑगस्टमध्ये २१ दिवस पावसाचा खंड पडला. मुगाची उत्पादकता एकरी ९० किलो, उडदाची दीड क्विंटल, सोयाबीनची अडीच क्विंटल राहिली. पावसाअभावी चोपडा, जळगावात सोयाबीन मोडण्याची वेळही आली. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ज्वारी, तृणधान्य, कडधान्यवर्गीय पिकांसह कापसाला फटका बसला.

कोरडवाहू कापसाचे एकरी ९० किलो ते दीड क्विंटल उत्पादन आले आहे. आता गुलाबी बोंड अळीचा शिरकाव सर्वत्र झाल्याने पीक पुरते उद्ध्वस्त झाले आहे. रब्बी हंगामाची स्थिती तापी व गिरणाकाठीच बरी आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके दुष्काळी जाहीर झाले. एक लाख ९० हजार हेक्‍टरऐवजी ५५ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. कमी पाण्यात येणाऱ्या हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हरभऱ्याची सुमारे ४० हजार, कोरडवाहू ज्वारी (दादर) व संकरित ज्वारीची सुमारे २० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. गहू, बाजरीची पेरणी सुरू आहे. रब्बीत मक्‍याचे क्षेत्र ६० ते ६५ हजार हेक्‍टरवर पोचण्याचा अंदाज होता़, परंतु लष्करी अळीमुळे ते वाया गेले आहे. जळगाव, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर भागात पीक मोडावे लागले.

गायीच्या दुधाला अपेक्षित दर नाहीत. दूध अधिक आल्यानंतर दूध संघ व खासगी संस्था ते अतिरिक्त ठरवित आहेत. रोज सुमारे २० ते २५ हजार गायीचे दूध अतिरिक्त होत आहे. त्याला पाच रुपये प्रतिलिटर, असे अनुदान शासनाने जाहीर केले. ते सहकारी संघांना अपेक्षेप्रमाणे अजूनही मिळालेले नाही. दुधाला प्रतिलिटर १७ ते १८ रुपये दर खरेदीदार देतात. दुष्काळीस्थितीमुळे चारा दुरापास्त झाला आहे. ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा पाच हजार रुपये झाला आहे. पशुखाद्य १२ रुपये प्रतिगोणी (६० किलो) आहे.

जिल्ह्यातील धरणांत साठा कमी असल्याने रब्बीसाठी गिरणा व वाघूरमधून दोनच आवर्तने मिळतील. पिण्याच्या पाण्याचे संकट जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, बोदवड, जामनेर, भडगाव व चाळीसगाव भागात वाढले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com