दूध
दूध

दूध व्यवसाय पुन्हा आतबट्ट्याचा

नगर ः नगरसह राज्यात दुष्काळाने होरपळ होत आहे. चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. असे असताना शासनाने दुधाचे प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान देणे जवळपास बंदच केल्याने दूध दराचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मात्र चारा, पशुखाद्याचे दर व दूध व्यवसाय करताना होणारा अन्य खर्चाचा विचार करता सध्या ज्या दराने दूध खरेदी केले जात आहे ते पाहता दूध व्यवसाय पुन्हा आतबट्ट्याचा झाला आहे.  राज्यात दुधचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून सातत्याने चर्चिला जात आहे. दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी संपावेळी सरकारने २७ रुपये प्रति दराने खरेदी करण्याचे अश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. दुधाची २७ रुपये दराने खरेदी करणार असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात केवळ प्रति लिटरला १७ ते १८ रुपये दर मिळत होते.  त्यामुळे दरात वाढ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यानंतर दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय झाला, परंतू आता महिनाभरापासून अनुदान बंद झाल्याने पुन्हा दुधाची जुन्या दराने म्हणजे ३.५ फॅट व ८.५ एफएनएसला असलेल्या दुधाला २० रुपये दर दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादकांच्या हाती १७ ते १९ रुपये पडत आहेत.  खरे तर राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही गेल्या वर्षभराच्या तुलनेत तीस टक्क्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत दुधाला किमान ३० रुपये प्रति लिटर दर मिळणे गरजेचे आहे. मात्र सध्याची परिस्थिती वरचेवर उलटी होत आहे. त्यामुळे दूध धंद्याला चांगले दिवस येण्याएवजी भर दुष्काळाच्या झळा सोसतानाही हा धंदा आतबट्ट्याचा होत चालला आहे.  साहेब जगणं महाग झालंय  दूध व्यवसायाबाबत सातत्याने भूमिका मांडणारे कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी (ता. २८) पत्र पाठवून राज्यातील दूध उत्पादकांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हणतात की, ‘‘साहेब आज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची अतिशय हाल होत आहे. राज्यात सर्व शेतकरी या महाभयानक दुष्काळाने हवालदिल झालेले आहेत. १९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या जवळ असणाऱ्या गोधनाचे फारच हाल आहेत. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरांचीही उपासमार होत आहे. दूध उत्पादन कमी होऊ लागले आहेत. असे असताना दुधाचे भाव कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. त्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आपण शेतकऱ्यांची दयनीय स्थिती लक्षात घेऊन शेतीपूरक असा दूध व्यवसाय जगविण्यासाठी मदत करावी आणि दधू व्यवसाय जिवंत ठेवावा, अशी मागणी गुलाबराव डेरे यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com