मॉन्सून परतीच्या प्रवासावर

माॅन्सूनची वाटचाल
माॅन्सूनची वाटचाल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शनिवारी (ता.२९) राजस्थानातील मुक्काम हलवून परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, गुजरातमधील कच्छ काही भाग आणि उत्तर अरबी समुद्रातून माॅन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या १६ दिवस आधी देश व्यापणाऱ्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल एक महिना उशिराने सुरू झाला. २९ जून रोजी देशभरात पोचलेल्या माॅन्सूनने तब्बल तीन महिने राजस्थानात मुक्काम केला.  यंदाच्या हंगामात मॉन्सूनने तीन दिवस आधी ३० जून रोजी संपूर्ण केरळ व्यापून कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात प्रगती केली. ८ जून रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात एकाच दिवशी वारे दाखल झाले. त्यानंतर ‘मेडन जुलिअन ऑस्सिलेशन’ ही हवामान स्थिती प्रतिकूल झाल्याने विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह खंडीत होत मॉन्सूनची वाटचाल थांबली. त्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी २३ जून रोजी मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, कोकणातून वाटचाल सुरू केली. २७ जून रोजी मोठा टप्पा पूर्ण करून देशाच्या बहुतांशी भागात पोचलेल्या मॉन्सूनने २९ जून रोजी देश व्यापला. साधारणत: १५ जुलै रोजी संपूर्ण देशात सर्वदूर पोचतो.  दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार माॅन्सून १ सप्टेंबर रोजी राजस्थानतून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यंदा माॅन्सून एक महिना उशिराने माघारी फिरला आहे. मॉन्सूनचे देशभरातील अस्तित्व दर्शविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) १७ सप्टेंबर रोजी निवळून गेला. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘दाये’ च्रकीवादळ घोंगावत होते. हे वादळ राजस्थानकडे सरकल्याने देशभर मॉन्सूनचे अस्तित्व कायम राहिले. मात्र ‘दाये’ विरून गेल्यानंतर राजस्थानातील बाष्प कमी होऊन हवामान कोरडे झाले. या भागात हवेचे दाब वाढून वाऱ्यांची दिशा बदलली. त्यानंतर शनिवारी (ता. २९) माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्याचे जाहीर करण्यात आले. मंगळवारपर्यंत (ता.२) मॉन्सून काही भागातून माघारी फिरण्याची शक्यता आहे.   ईशान्य मॉन्सून हंगामात सर्वसाधारण पाऊस नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) देशभरातून परतल्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून वाऱ्यांमुळे पाऊस सुरू होतो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक या राज्यांत आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाऊस पडतो. तमिळनाडूमध्ये वर्षभरातील सरासरी ४८ टक्के पाऊस हा ईशान्य मॉन्सून हंगामात होतो. १९५१ ते २००० या कालावधीतील सरासरीनुसार या हंगामात ३३२.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ८९ ते १११ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गेल्या काही वर्षांतील माॅन्सूनची राजस्थानातील परतीची सुरवात

वर्ष  परतीची सुरवात
२०११  २३ सप्टेंबर
२०१२    २४ सप्टेंबर
२०१३ ९ सप्टेंबर
२०१४ २३ सप्टेंबर
२०१५  ४ सप्टेंबर
२०१६   १५ सप्टेंबर
२०१७  २७ सप्टेंबर
२०१८   २९ सप्टेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com