परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारी

माॅन्सून वाटचाल
माॅन्सून वाटचाल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. तर राजस्थानातून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरातच परतीचा प्रवास पूर्ण केला आहे.  

वायव्य भारतात हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन) तयार होऊन, पावसाची उघडीप असल्यानंतर राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर करण्यात येते. सलग पाच दिवस पावसाची उघडीप, सकाळच्या वेळी हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरीक्षणानंतर मॉन्सूनची देशाच्या विविध भागातील परतीची वाटचाल ठरते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते.

केरळमध्ये यंदा तब्बल आठवडाभर उशिराने दाखल होणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल सुरुवातीपासून अडखळत झाली. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. देवभुमी केरळात तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. साधारणत: ७ जूनपर्यंत तळ कोकणात पोचणारा मॉन्सून, १९७२ नंतर प्रथमच २० जून रोजी तळकोकणात पोचला. तसेच २५ जून रोजी वाऱ्यांनी राज्य व्यापले. त्यानंतर मजल दरमजल करत दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. मॉन्सून कालावधीत जून ते सप्टेंबर देशात ११० टक्के पाऊस पडला. ११९४ नंतर २५ वर्षानंतर देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

यंदाच्या हंगामात उशिराने झालेले आगमन, पावसाची प्रमाण, परतीची सुरुवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले गेले. बुधवारी (ता. ९) राजस्थानातून माघारी फिरलेल्या मॉन्सूनचा आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने परतीच्या प्रवास ठरला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यानंतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा या दोन्ही वेळा चुकवून मॉन्सून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाला. मॉन्सूनचा परतीचा प्रवास प्रचंड वेगाने झाला. आठवडाभरातच मॉन्सून संपुर्ण देशातून परतला. तब्बल सव्वा महिना उशिराने परतीवर निघालेल्या मॉन्सूनने दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या (१५ ऑक्टोबर) केवळ एक दिवस उशिराने देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतातील राज्यामध्ये ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला असून, १५ डिसेंबरपर्यंत या राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून मुक्काम करेल.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनची परतीची वाटचाल 

वर्ष राजस्थानातून माघार देशाचा निरोप
२०११ २३ सप्टेंबर २४ ऑक्टोबर
२०१२ २४ सप्टेंबर १८ ऑक्टोबर
२०१३ ९ सप्टेंबर २१ ऑक्टोबर
२०१४ २३ सप्टेंबर १८ ऑक्टोबर
२०१५ ४ सप्टेंबर १९ ऑक्टोबर
२०१६ १५ सप्टेंबर २८ ऑक्टोबर
२०१७ २७ सप्टेंबर २५ ऑक्टोबर
२०१८ २९ सप्टेंबर २९ ऑक्टोबर
२०१९ ९ ऑक्टोबर १६ ऑक्टोबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com