बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक तक्रारी

बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याचा जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक हेक्टरला फटका बसला आहे. जिल्ह्यातील २७५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
More than 2700 complaints about soybeans in Buldana
More than 2700 complaints about soybeans in Buldana

बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे  सोयाबीनची उगवण न झाल्याचा जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक हेक्टरला फटका बसला आहे. जिल्ह्यातील २७५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. यात महाबीजसह खासगी कंपन्यांविरुद्धच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यात या हंगामात जवळपास ५० कंपन्यांनी बियाण्याची विक्री केली आहे. तीन हजार हेक्टरवरील पेरणीला या बियाण्याची झळ बसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. सध्या हे तक्रारदार शेतकरी मदतीची अपेक्षा करीत आहेत.

हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारींचा सूर निर्माण झालेला आहे. प्रामुख्याने तक्रारींचा ओघ हा खामगाव, चिखली, संग्रामपूर, नांदुरा, मेहकर आदी तालुक्यांमध्ये अधिक आहे. प्रशासनाने सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. यानुसार प्रत्येक तालुक्यातून तक्रारींचा ओघ वाढला होता. मिळालेल्या माहितीनुसार २७५२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाने यापैकी २२०० तक्रारींची पाहणी सुद्धा झाल्याचा दावा केला आहे.

प्रामुख्याने या तक्रारी बियाणे न उगवल्याबाबत आहेत. तपासणीत बियाण्याबाबत विविध प्रकारची कारणे दिसून आली. यात सोयाबीन न उगवण्यामध्ये पेरणीनंतर जोराचा पाऊस, दाणे खोलवर पडणे किंवा पेरणीनंतर पावसाचा खंड ही कारणे या दोष नसलेल्या बियाण्याबाबत दिली जात आहेत. तर काही तक्रारींमध्ये बियाण्यात दोष असल्याची बाबही स्पष्ट होत आहे.  प्रशासनाकडे प्रत्यक्षात २७५२ तक्रारी आलेल्या असल्या तरी खासगी कंपन्यांनी बदनामीपोटी स्थानिक पातळीवर आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे बदलून किंवा मोबदला देत तक्रारी कृषी खात्यापर्यंत जाऊ दिल्या नाहीत. यामुळे ही १३ तालुक्यांच्या मोठ्या विस्ताराच्या जिल्ह्यात तक्रारींची संख्या कमी दिसून येत आहे. प्रशासनानेही विक्रेत्यांच्या बैठका घेत तक्रारींबाबत कंपनी प्रतिनिधींना ही बाब कळवीत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्याबाबत सांगितले होते.

काही कंपन्यांनी ही गोष्ट गांभीर्याने मनावर घेत तडजोडीची भूमिका घेत प्रकरणे जागेवरच मिटवली. काही कंपन्यांनी आपला दोष नसल्याचे सांगत मदतीला नकार दिला. याच कारणातून जिल्ह्यात चिखलीमध्ये  औरंगाबाद येथील एका बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बियाण्याबाबतच्या तक्रारीविरुद्ध कारवाई करावी यासाठी शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आता प्रशासनावर सातत्याने दबाव ठेवून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com