आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू

आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू

मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित ४,५१८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या गावांमध्ये दुष्काळ उपाययोजनांच्या आठ सवलती देण्यात येणार आहेत. ‘आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबवणार’ या मथळ्याखाली या संदर्भातील वृत्त सर्वप्रथम दैनिक ‘अॅग्रोवन’ने १० फेब्रुवारी रोजी दिले होते. केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे, अशा २६८ महसुली मंडळांमध्येही राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला आहे. तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळांतील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या गावांमध्येही आठ उपाययोजना राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. या यादीत न आलेल्या परंतु जनतेची व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या व अद्याप दुष्काळसदृश परिस्थिती घोषित न केलेल्या ४५१८ गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळी उपाययोजनांच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जाहीर झालेल्या जिल्हानिहाय गावांची संख्या अशी आहे, (कंसात गावांची संख्या) - धुळे (५० गावे), नंदुरबार (१९५ गावे), अहमदनगर (९१), नांदेड (५४९), लातूर (१५९), पालघर (२०३), पुणे (८८), सांगली (३३), अमरावती (७३१), अकोला (२६१), बुलडाणा (१८), यवतमाळ (७५१), वर्धा (५३६), भंडारा (१२९), गोंदिया (१३), चंद्रपूर (५०३), गडचिरोली (२०८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com