ऑगस्टअखेर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

या लेखात आपण ऑगस्ट महिन्यापर्यंत मराठवाड्यातील तालुकानिहाय हवामान, पर्जन्यमान व पिकाचे नियोजन यांची माहिती जाणून घेऊ.
More than average rainfall in Marathwada by the end of August
More than average rainfall in Marathwada by the end of August

मागील भागात आपण मराठवाडा विभागातील मान्सूनचे आगमन पीक पेरणी एकूण क्षेत्र जुलै महिन्यापर्यंतचे हवामान व   पर्जन्यमान  स्थिती याची माहिती घेतली या लेखात आपण ऑगस्ट महिन्यापर्यंत मराठवाड्यातील तालुकानिहाय हवामान , पर्जन्यमान व पिकाचे नियोजन यांची माहिती जाणून घेऊ. मराठवाड्यात या वर्षी मान्सूनचे आगमन १२ जूनला झाले. काही तालुके वगळता १४ जून पर्यंत मान्सूनने संपूर्ण मराठवाडा व्यापला.  जून ते ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यात आकाश  ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम  स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.  या वर्षी मराठवाड्यातील बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस झाला असून जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. यामुळे काही भागात पिकाचे नुकसानही झाले असले तरी सामान्यतः पीक परिस्थिती समाधानकारक आहे. पर्जन्यमान 

  • १  जून ते ३० ऑगस्ट या कालावधीतील मराठवाडा विभागातील सरासरी पर्जन्यमान ५०७.३ मिमी आहे. या वर्षी ३० ऑगस्टपर्यंत ५५६.० मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. म्हणजेच सरासरीच्या १०९.६ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी ३० ऑगस्ट अखेर ३६३.० मिमी म्हणजेच सरासरीच्या ७१.६ टक्के  पर्जन्यमानाची नोंद झाली 
  • होती. 
  • मराठवाडा विभागातील ३० ऑगस्ट  अखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानाचा आढावा घेतल्यास पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण ७६ तालुक्यांपैकी २ तालुक्यात ५१ ते ७५  टक्के, २९  तालुक्यात ७५  ते १०० टक्के तर ४५ तालुक्यात १०० टक्के पेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली.
  • हवामानाचे परिणाम

  • मागील तीन महिन्यात ढगाळ वातावरण व सतत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागले.
  • सतत पाऊस झाल्यामुळे पिकात वापसा नाही. हळद, सोयाबीन, तूर, कापूस यासारखी पिके पिवळे पडण्याची लक्षणे दिसून आली.
  • मूग व  उडीद यासारखे पिके काढणीला आलेल्या पिकांना कोंब फुटले.
  • सोयाबीन पीक शेंगा लागणे ते  शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. सतत ढगाळ व दमट वातावरणामुळे सोयाबीन पिकावर पाने  खाणारी अळी, उंट अळी  व खोडकिडीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे.
  • कापूस पीक  पाते लागणे ते फुले लागणे तर काही भागात  बोंडे लागण्याच्या  अवस्थेत आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • सतत पाऊस व शेतामध्ये वापसा नसल्यामुळे पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढला.
  • सतत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • उपाययोजना

  • पावसाने उघडीप दिल्यास वापसा स्थिती झाल्यावर आंतरमशागतीचे कामे करून पीक तणमुक्त करावी.
  • पिकात पाणी साचले असल्यास लवकरात लवकर निचरा  करून घ्यावा. येत्या काळात जास्त पाऊस झाल्यास पिकात  पाणी साचणार नाही, अशी व्यवस्था करावी.
  • मूग पिकाची काढणी केली नसल्यास काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसत  असल्यास तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेऊन संबंधित विद्राव्य खताची फवारणी करावी. 
  • पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
  • बागेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त पाने फळे इ. काढून नष्ट करावे.
  • पावसाची उघडीप असल्यावर हंगामी पिके व फळबागेत आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बुरशीनाशकाची व  कीडनाशकाची  फवारणी करून घ्यावी.
  • तापमानाचा व पाण्याचा ताण बसल्यास पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. पीक फुलोऱ्यावर व फळाची वाढ होत असताना जमिनीत योग्य ओलावा आवश्यक असतो. येत्या काळात पावसाने उघडीप दिल्यास  या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळगळ अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे  या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • सरासरीच्या तुलनेत  प्रत्यक्ष पडलेल्या  पावसानुसार मराठवाड्यातील तालुक्याची वर्गवारी  

    पर्जन्यमान टक्केवारी तालुक्यांची संख्या तालुक्याचे नाव
     ० ते २५ टक्के --
    २६ ते ५० टक्के --
    ५१ ते ७५ टक्के नांदेड जिल्हाः  माहूर. लातूर जिल्हाः  चाकूर.
    ७६ ते १०० टक्के २९ लातूर जिल्हाः लातूर, अहमदपूर, उदगीर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ.  नांदेड जिल्हाः बिलोली, कंधार, हदगांव, देगलूर, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, नांदेड, मुखेड, किनवट.  उस्मानाबाद जिल्हाः उस्मानाबाद, परंडा, भूम, लोहरा, तुळजापूर, कळंब, वाशी, उमरगा.  बीड जिल्हाः शिरूर कासार.  हिंगोली जिल्हाः वसमत. परभणी जिल्हाः  परभणी, गंगाखेड, सोनपेठ.
    १०० टक्के पेक्षा जास्त ४५ औरंगाबाद जिल्हाः औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगांव, फुलंब्री.  बीड जिल्हाः  बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगांव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, अडवणी.  हिंगोली जिल्हाः  हिंगोली, कळमनूरी, औंढा, शेणगांव.   जालना जिल्हाः भोकरदन, जाफ्राबाद, जालना, अंबड, परतुर, बदनापूर, घनसावंगी, मंठा.  लातूर जिल्हाः औसा, निलंगा, देवणी, जळकोट.  नांदेड जिल्हाः लोहा, अर्धापूर, नायगांव (खै), भोकर.  परभणी जिल्हाः पाथ्री, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, मानवत.

      संपर्क- डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२ (अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com