सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. प्रत्येक उपचार पद्धतीमध्ये “आहाराला” महत्त्वाचे स्थान आहे. अचानक बदलणाऱ्या तापमानामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. सर्दी ,खोकला, घसा दुखी, डोकेदुखी या सर्व आजारापासून वाचण्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. सध्याच्या काळात आपल्या आहारात फळांचा समावेश करावा. आपल्या शरीरात जीवनसत्त्व ‘क’ असणे गरजेचे आहे. जीवनसत्त्व ‘क’ हे क्षय, दमा, फुप्फुसाचे आजार, सर्दी, खोकला इत्यादी आजारामध्ये रुग्णांची क्षमता वाढवण्यास व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. जीवनसत्त्व ‘क’ याचे प्रमाण सर्वांत जास्त आंबट फळांमध्ये असते. लिंबू, आवळा ,संत्री, मोसंबी, टोमॅटो, द्राक्ष,अननस, डाळिंब, किवी , पेरू, स्ट्रॉबेरी आणि भाज्यांमध्ये सुद्धा जीवनसत्त्व ‘क’ असते. आहारात शतावरी, अश्वगंधा,शिलाजित,तुळस आणि हळदीचा वापर केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.आपल्या आहारात जीवनसत्त्व, खनिजयुक्त पदार्थ वाढविण्याची गरज आहे. मोसंबी
रोग प्रतिकार क्षमता वाढते. शरीरातील अशक्तपणा दूर होतो जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी फायदेशीर. नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते. पौष्टिक, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारे, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. स्क्वॅश, सिरप, मार्मालेड, जॅम आदी पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. मोसंबीचा रस काढून, गाळून घ्यावा. स्क्वॅश बनविताना रस कमीत कमी २५ टक्के, एकूण विद्राव्य घटक ४५ टक्के व आम्लता ०.८ टक्का असणे आवश्यक आहे. रस एक लीटर, साखर १.६९४ कि.ग्रॅ. सायट्रिक आम्ल २० ग्रॅम, पाणी १२५० मि.लि., सोडिअम बेंझोएट दोन ग्रॅम या प्रमाणात वापरावे. प्रथम साखर, पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारी मळी काढून घ्यावी. तयार झालेले पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये रस एकजीव करून घ्यावा. दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून ते स्क्वॅशमध्ये मिसळावे. तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात. सिरप बनविताना प्रमाणीकरणानुसार कमीत कमी २५ टक्के रस, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६५ टक्के, आम्लता ०.८ ते १.२ टक्का असावी. एक लीटर रस असल्यास, २.५ कि.ग्रॅ. साखर, २० ग्रॅम सायट्रिक आम्ल, २ ग्रॅम सोडिअम बेंझोएट वापरावे. सिरप तयार करण्याची कृती, पॅकिंग व साठवण स्क्वॅशप्रमाणे करावी. -सिरपपासून सरबत बनविताना त्यामध्ये चार ते पाच पट पाणी मिसळून थंड करून पिण्यासाठी वापरावे. जेली तयार करण्यासाठी रसरशीत ताजी व पक्व फळे निवडावीत. फळे पाण्याने धुऊन, सोलून, पांढरा पापुद्रा काढून स्वच्छ करावीत. स्वच्छ केलेल्या मोसंबीच्या फोडींचे छोटे छोटे काप करून घ्यावेत. एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात वरील काप घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात मंद शेगडीवर उकळत ठेवावेत. थोड्या वेळाने शिजविलेले फोडींचे तुकडे मलमलच्या कापडात बांधून टांगून ठेवावेत. कापडातून झिरपणारा फोडींचा रस दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यात जमा करावा. या रसात १:१ या प्रमाणात साखर मिसळून रस उकळावा. हे द्रावण एकूण विद्राव्य घटक ६७.५ अंश ब्रिक्सच्या वर येईपर्यंतच उकळावे. तयार झालेली जेली रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून ठेवावी. जेली थंड व कोरड्या जागी साठवावी. मार्मालेड तयार करताना जेलीमध्ये शिजलेल्या सालीचे तुकडे टाकतात. सुरुवातीला सालीचे छोटे छोटे तुकडे करावेत. एका स्टीलच्या पातेल्यात हे तुकडे घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवावेत. हे करत असताना तीन वेळा पाणी उकळून बदलावे. तयार जेलीमध्ये मोसंबीच्या सालीचे तीन वेळा उकळलेले तुकडे टाकावेत. हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त. वात,पित्त आणि कफ दोषांवर उपयुक्त, यात जीवनसत्त्व ‘क’ असते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यात त्याची मदत होते. ज्यूस, सुपारी, लोणचे, चटणी, मुरब्बा, कॅन्डी, पावडर घरच्या घरी तयार करता येते. आवळे स्वच्छ धुऊन उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. तुकडे बरणीत भरून २ चमचे सैधव मीठ, १ चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरपूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा पूड मिसळावी. सर्व मिश्रण एकत्र मिसळावे. हे मिश्रण ३ दिवस मुरू द्यावे. दिवसातून दोन वेळा हलवावे.नंतर मिश्रण ताटामध्ये पसरवून उन्हात वाळवावे. ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी. अर्धा किलो आवळे मंद आचेवर वाफवून, बिया वेगळ्या कराव्यात. कढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या लालसर रंग होईपर्यंत तळाव्यात. तेलामध्ये १ मोठा चमचा मोहरी व प्रत्येकी १ चमचा जिरे, बडीशेप, १/४ चमचा ओवा, १ चिमूट हिंग, अर्धा चमचा हळद व गरम मसाला तळून घ्यावा. तेलातील मिश्रणात आवळे सोडावेत, चवीनुसार मीठ घालून मिसळावे. सर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे. बरणीत भरावे. आवळ्याचे तुकडे करून त्यामध्ये बिया वेगळ्या करून ते मिक्सरमध्ये दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी. थोडे पाणी टाकावे. हे मिश्रण परत मिक्सर मध्ये दळावे. मिश्रणाला गाळून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे त्यात काळी मिरी, आले हे चवीसाठी मिसळावे. आवळ्यामधील बिया वेगळ्या करून ग्राइंडर मध्ये ठेवावे. आले, मीठ चवीसाठी मीठ मिसळून चटणी बनवावी. : ज्ञानेश्वर शिंदे, ७५८८१७९५८० (अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,सॅम हिगिनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज,उत्तर प्रदेश