नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या शेततळ्याचे रखडलेले अनुदान वितरित करण्यासाठी १० कोटी ७९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कृषी विभागाने हा निधी तालुका पातळीवर वितरित केला आहे. राज्यात सर्वाधिक निधी नगर जिल्ह्याला मिळाला आहे.
सरकारने शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळावा यासाठी मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली होती. या योजनातून नगर जिल्ह्यात आतापर्यंत सोळा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी शेततळे उभारली आहेत. या शेततळ्याचा दुष्काळाच्या काळात चांगला फायदा झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे निधी उपलब्ध होत नसल्याने शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद केली. मात्र आधी उभारलेल्या शेततळ्याचे अनुदान रखडले होते. दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना नुकतेच राज्यासाठी ५२ कोटींचे अनुदान शासनाने दिले आहे. त्यातील सर्वाधिक १० कोटी ७६ लाख रुपये एकट्या नगर जिल्ह्याला मिळाले आहे. नगर जिल्ह्यात २२६० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती. त्यासाठी ११ कोटी १३ लाखांची गरज आहे. त्यातील १० कोटी ७९ लाख ७३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत, यात बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.
तालुकानिहाय निधी वितरण २६ लाख १२ हजार, पारनेर ः ३६ लाख ७३ हजार, पाथर्डी ः ७१ लाख ४५ हजार, जामखेड ः १३ लाख २१ हजार, श्रीगोंदा ः ४ कोटी ३८ लाख ५२ हजार, कर्जत ः १ कोटी ९७ लाख ३० हजार, नेवासा ः ६२ लाख ८५ हजार, श्रीरामपूर ः १० लाख ५२ हजार, शेवगाव ः ३८ लाख ३६ हजार, राहुरी ः २७ लाख ७५ हजार, संगमनेर ः ४४ लाख ४९ हजार, राहाता ः ४९ लाख ५० हजार, कोपरगाव ः २३ लाख ७७ हजार, अकोले ः ३९ लाख ३७ हजार.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.