अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात अाले. धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात, यासाठी धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजास आरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ नुसार केलेला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे, परंतु राज्य शासनाने या संदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही, असा अांदोलकांचा अारोप अाहे.